अभिजित डाके
Khilar Rearing Success Story :
सांगली जिल्ह्यात सलगरे (ता. मिरज) हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले गाव आहे. लोकसंख्या साडेसहा हजारांपर्यंत आहे.
कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने शेती कोरडवाहू होती. पोटापुरतं पिकवून मिळालेल्या उत्पन्नातून उदरनिर्वाह केला जायचा. पैशांची चणचण असल्याने मजुरीवर सारी भिस्त होती.
खिलार जनावरे पालनाची परंपरा
काळ होता पन्नास साठ वर्षांपूर्वीचा. दुष्काळ असला तरी इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात एक ते दोन खिलार गायी आढळायच्या. या परंपरेतूनच जातिवंत देशी खिलार पैदास करून खोंडांची विक्री करण्याच्या व्यवसायाचा मार्ग गावाला मिळाला.
हळूहळू जनावरांची संख्या वाढू लागली. रस्त्यांच्या बाजूने शेळ्या-मेंढ्याचे कळप जावेत तशा प्रकारे शेकडोंच्या संख्येने गोवंश गावाच्या माळनारानावर चरताना दिसू लागला. मुळात त्यांना दावं लावलं जात नाही. गायींचे दूध न काढता वासरांनाच पाजले जाते. अशी धष्टपुष्ट वासरं, खोंडं माळरानांवर हुंदडताना दिसू लागली.
गावाची सर्वदूर ओळख
राज्यात कुठेही जा, बैलगाडा शर्यत ही शौकिनांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. अशा शर्यतीच्या अनेक अड्ड्यांवर एक से बढकर एक खोंड दिसून येतात. साहजिकच त्यातील एखादे खोंड पाहून शौकीन हा खोंड कोठून आणला असे विचारतात. त्या वेळी सलगरे गावातून तो घेतला अशी माहिती मिळते.
अशा प्रकारे ‘माउथ टू माउथ’ प्रसिद्धीतून शर्यतीसाठी खात्रीशीर खोंड मिळणारे गाव अशी सलगरेची सर्वदूर प्रसिद्धी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी गावात सुमारे दीड ते दोन हजारांपर्यंत खिलार जनावरांची संख्या होती. सन २०१४ च्या दरम्यान बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी आली.
त्याचा फटका गावातील खोंड विक्रीवर झाला. या काळात शेतकऱ्यांनी पै-पाहुण्यांकडे जनावरे सांभाळण्यासाठी दिली. काहींनी संख्या कमी केली. या वेळी खोंडांचे दरही कमी झाले. आठ वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये शर्यतीवरील बंदी उठली. त्यामुळे पुन्हा शर्यतीच्या खोंडांना मागणी वाढली आहे.
सर्वत्र मागणी
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, सांगोला येथील आठवडी जनावरांच्या बाजारात सलगरे येथील शर्यतीच्या खोंडांना विशेष मागणी असते. सातारा, पुणे, कोकणासह कर्नाटकातील बेळगावसह विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बागलकोट ते अगदी कोलकाता येथूनही हौशी शेतकरी थेट गावात येऊन, शेतकऱ्यांच्या वाड्यात जाऊन खोंडांची खरेदी करताना दिसतात.
खोंड खरेदी करताना कान, शिंग, बारीक शेपूट, तोंडावर कोसा, चित्रा, काळा हरणा, पांढरा असे रंग पाहिले जातात. शिवाय खोंडाची शरीरयष्टी, चपळपणा या बाबी तपासून त्यानुसार दर ठरतात. काळा मोरा ९० हजारांपासून दीड लाखापर्यंत, पांढरा कोसा ८० ते ९० हजार, चित्रा दीड ते दोन लाख असे दर आहेत.
एक वर्षाच्या आतील खोंडांना अधिक मागणी असते. खोंड तयार करताना १० ते १२ महिन्यांनंतर त्यांना गाडीला जुंपण्यात येते. शर्यतीच्या अंतरानुसार तालीम दिली जाते. सातू, हरभरा, डाळी, मटकी, तांबडा हुलगा यांचा भरडा दिल्याने खोंडांमध्ये ताकद येते. पायांत ताकद येण्यासाठी त्यांना नांगराला जुंपले जाते.
आर्थिक उलाढाल
आजमितीला गावात ५०० हून अधिक खिलार गायींचे संगोपन होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या दावणीला पाच ते १० पर्यंत गायींची संख्या आढळते. वर्षभरात सुमारे २०० ते ३०० पर्यंत खोंडांची विक्री होत असावी.
त्यातून कोटीहून अधिक उलाढाल होते. त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. जोडीला म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी गावात आल्याने नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. त्यातून उत्पन्नवाढीला अजून चालना मिळाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.