
Agriculture Success Story : माळकिन्ही गावाचा समावेश पूर्वी पुसद तालुक्यात होता. त्यानंतर महागाव तालुक्यात या गावाचा समावेश करण्यात आला. तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून चार हजारांवर लोकसंख्या आहे. गावात जिरेमाळी समाजाबांधवाचे वास्तव्य जास्त आहे. त्यांचा परंपरागत भाजीपाला उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यामुळेच गावातील ७० टक्के शेतकऱ्यांद्वारे भाजीपाला उत्पादन घेतले जाते. भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांनी आर्थिक बाजू मजबूत केली आहे.
अल्प जमीनधारणा असूनही संपन्नता
भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून माळकिन्हीची संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ओळख आहे. येथील राहुल प्रकाश खंदारे यांच्या कुटुंबाकडे अवघी ०.५५ आर शेती आहे. मागील दहा ते १५ वर्षांपासून त्यांनी भाजीपाला उत्पादनात सातत्य राखले आहे. पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, फुलकोबी आदी पिकांच्या लागवडीवर त्यांचा भर असतो. सध्या त्यांनी वांगी आणि मिरची लागवड केली आहे.
भाजीपाला उत्पादकांचे गाव अशी ओळख मिळाल्याने व्यापारी थेट बांधावरून येऊन उत्पादित मालाची थेट खरेदी करतात. घाऊक दरात शेतीमालाची खरेदी करून त्याची विक्री दिग्रस, आर्णी, पुसद वणी, पांढरकवडा, आदिलाबाद या भागांत केली जाते. त्यामुळेच पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासंबंधी कोणतीच अडचणी येत नसल्याचे राहुल खंदारे विश्वासाने सांगतात. बांधावरूनच थेट खरेदी होत असल्याने अडत, कमिशन आणि वाहतुकीवरील खर्चात मोठी बचत होते. त्यामुळे गावातील बहुतांश युवा शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे गावातील युवकांना रोजगार मिळाला आहे.
- राहुल प्रकाश खंदारे, ९८८१९०९९७३
शेतकरी अनुभव
माझ्या कुटुंबाची तीन एकर शेती आहे. मिरची, टोमॅटो, कारली, कोबी या सारखे पिके घेण्यावर माझा भर असतो. पावसाळ्यात कापसाचे बीजोत्पादन घेतले जाते. साधारणपणे ३५ हजार रुपये क्विंटलला दर मिळतो. यामध्ये क्रॉसिंगची प्रक्रिया किचकट असून, दोन महिन्यांचा कालावधी लागतो. एकरी आठ ते ९ क्विंटलची उत्पादकता यातून मिळते. हा अपवाद वगळता उर्वरित क्षेत्रावर भाजीपाला लागवडीवर भर असतो. या व्यावसायिक पिकांमुळे माझ्यासह अनेकांच्या जीवनात समृद्धी आली आहे. मिरचीला सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो.
- नितीन पुंड, ७४४८१६०४३४
माझ्याकडील दोन एकर क्षेत्रात मेथी, पालक, कोंथिबीर, तर पावसाळ्याच्या कालावधीत मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी यांसारखी पिके घेतो. मागील ७ ते ८ वर्षांपासून या पिकांच्या लागवडीत सातत्य राखले आहे. तत्पूर्वी सोयाबीन, कपाशी, हरभरा या पिकांचे उत्पादन घेत होतो. गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे मी देखील सुरुवातीला व्यापाऱ्यांना भाजीपाला देत होतो. मात्र यातून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने थेट विक्री करण्याचे ठरविले. त्याकरिता दुचाकी विकत घेतली. दुचाकीच्या मागील बाजूस भाज्यांचे क्रेट बांधून माहूर, महागाव, पुसद, गुंज, हिवरा या गावांमध्ये भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जायला सुरुवात केली. या माध्यमातून एका दिवसात अडीच ते तीन हजार रुपयांच्या भाज्यांची विक्री होते. हाच शेतीमाल व्यापाऱ्याला दिला असता, तर केवळ एक हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले असते, असे शेतकरी नारायण मत्ते सांगतात.
- नारायण मत्ते, ७३७८७२१३७०
माझी १६ एकर शेती असून यातील चार ते पाच एकरांवर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले जाते. लागवड, मजूर उपलब्धता आणि बाजारभाव आदी बाबी विचारात घेऊन लागवड क्षेत्र कमी जास्त केले जाते. कलिंगड, मेथी, फ्लॉवर, हिरवी मिरची, उन्हाळ काकडी आदी पिके घेतली जातात. उत्पादित मालाची आर्णी, आदिलाबाद, यवतमाळ या भागांत विक्री करण्यावर भर दिला जातो. भाजीपाला पिके व्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रावर कपाशी, तूर, सोयाबीन लागवड असते. या वर्षी प्रथमच दोन एकरांवर कांदा बीजोत्पादनाचा प्रयोग केला आहे.
- किसन कलाने, ८९९९२९४३६२
रोपवाटिका व्यवसायातून रोजगार
अक्षय पांडुरंग खंदारे यांची सहा एकर शेती आहे. गावातील भाजीपाला उत्पादकांना लागवडीसाठी दर्जेदार रोपे लागतात. ही गरज लक्षात घेऊन अक्षय यांनी रोपवाटिका व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२० मध्ये भाजीपाला रोपांच्या उपलब्धतेसाठी संत सावतामाळी नावाने दोन एकरांवर रोपवाटिकेची उभारणी केली. उर्वरित चार एकरांत मिरची आणि टोमॅटो या पिकांची लागवड असते. रोपवाटिकेतून वर्षाकाठी ३० ते ४० लाख रोपांची विक्री होते. यामध्ये सर्वाधिक कलिंगड आणि टोमॅटो या रोपांचा समावेश असतो. सोबतच खरबूज, झेंडू, मिरची, वांगी, कोबी, पपई रोपांना चांगली मागणी असते.
रोपे निर्मितीसाठी यंत्र
रोपवाटिका व्यवसायात मजुरांची गरज अधिक भासते. गावात मजुरांची उपलब्धता होत नसल्याने इतर गावामधून मजुरांची उपलब्धता करावी लागत होती. त्यावर पर्याय म्हणून सात लाख रुपये खर्च करून रोप निर्मितीसाठी संयंत्र खरेदी केले. हे सेमी ऑटोमॅटिक प्रकारातील यंत्र असून ट्रेमध्ये कोकोपीट भरून तो मशिनमध्ये ठेवला जातो. त्यानंतर यामध्ये कोकोपीटसह १०४ बियाणे टोकण केले जाते.
- अक्षय खंदारे, ७७७४८४०६२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.