Farmer Success Story : ‘लेमन व्हिलेज’ पोथरेने केले गावकऱ्यांना कर्जमुक्त

Lemon Farming : लेमन व्हिलेज’ असा लौकिक गावाने मिळवला आहे. वर्षभर उत्पादन, गावातच मार्केट आणि रोख व्यवहारांमुळे शेतकऱ्यांना ताजे उत्पन्न मिळू लागले आहेत.
Lemon Trees
Lemon Trees Agrowon
Published on
Updated on

Solapur News : एकेकाळी जेमतेम पाण्यावर आधारित शेती असलेल्या पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) गावाने लिंबाच्या शेतीतून परिवर्तन घडवले. ‘लेमन व्हिलेज’ असा लौकिक गावाने मिळवला आहे. वर्षभर उत्पादन, गावातच मार्केट आणि रोख व्यवहारांमुळे शेतकऱ्यांना ताजे उत्पन्न मिळू लागले आहेत. अनेकांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा या पिकातून उतरवणे शक्य झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा-जामखेड महामार्गावर पोथरे हे तीन-चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. येथील पुरातन शनिदेव मंदिरामुळे गावाला आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. पूर्वीपासून ऊस, तूर, कांदा, भाजीपाला पिके होतात. करमाळ्यासारखे शहर अवघ्या काही अंतरावर असल्याने बाजारपेठ जवळ आहे. परंतु पाण्याच्या जेमतेम स्थितीमुळे काही ठरावीक पिकांपुरतीच भागातील शेती सीमित राहिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सन १९८० च्या सुमारास (कै.) पांडुरंग झिंजाडे यांनी गावात सर्वप्रथम लिंबाचे पीक आणले. कमी पाणी, कमी खर्च आणि वर्षभर उत्पन्न देणारे हे पीक म्हणून त्याला प्राधान्य दिले. पहिला प्रयोग यशस्वी झाला. चांगले उत्पन्न मिळाल्याने उत्साह वाढला. मग एकेक शेतकरी त्यांची प्रेरणा घेऊ लागले. आज संपूर्ण करमाळा तालुक्यातील लिंबाचे गाव म्हणून पोथरेची विशेष ओळख तयार झाली आहे.

सुमारे साडेसातशे एकरांवर लिंबू

गावचे भौगोलिक क्षेत्रफळ पाच हजार एकरांपर्यंत आहे. प्रत्यक्षात अडीच ते तीन हजार एकर क्षेत्र लागवडीखाली असून, सर्वाधिक७५० एकरांत लिंबू आहे. बाकी अन्य नेहमीची आणि सीताफळ, पेरू अशी पिके आहेत. पण गावातील प्रत्येकाकडे किमान एक एकर तरीलिंबू पाहायला मिळतोच. अनेकांकडे १५ ते २० वर्षे जुन्या बागा पाहण्यास मिळतात. त्या भरघोस उत्पादन देतात.

बहुतेक क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या साई सरबती वाणाखाली आहे, किडी-रोगांचा कमी प्रादुर्भाव आणि चांगले उत्पन्न देणारे हे वाण असल्याचा इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. साधारण जूनमध्ये नवी लागवड होते.

सुमारे २० बाय २० फूट अंतरावर एकरी ११० रोपे बसतात. पहिली तीन वर्षेझाडे केवळ मोठी होऊ दिली जातात. त्यानंतर मृग, हस्त आणि आंबिया अशा तीनही बहरांत उत्पादन घेणे सुरू होते. पुढील मग किमान १५ ते त्यापुढील काही वर्षे ही बाग उत्पादन देत राहते.

Lemon Trees
Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकरी अपात्र

आश्‍वासक अर्थकारण

पोथरे गावातील शेतकरी एकरी सरासरी १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादन घेतात. उत्तम व्यवस्थापन आणि त्यास हवामानाची साथ मिळाली, तर त्याहीपुढे उत्पादनाचा पल्ला गाठणारे शेतकरी गावात आहेत. हे शेतकरी या पिकातील तज्ज्ञच झाले आहेत.

नव्या लागवडीसाठी एकरी ५० हजारांपर्यंत, तर जुन्या बागेत दरवर्षी बहरात सुमारे ४० हजार रुपये खर्च होतो. वर्षभरात प्रति किलो किमान १० रुपये, सरासरी ३० रुपये, तर सर्वाधिक ८० रुपये दर मिळतो.

तीस रुपये दर गृहीत धरला, तर या पिकातून तीन ते चार लाखांपासून ते दोन- अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हाती येते. लिंबूचे अर्थकारण लक्षात घेऊन गाव परिसरातील कामोने, आर्जापूर, रावगाव, खांबेवाडी, धायखिंडी, निलज या गावांमध्येही लिंबाचे क्षेत्र विस्तारले आहे.

या गावांमध्ये चहूकडे उंचच्या उंच, डेरेदार अशा हिरव्या-पिवळ्या लिंबांनी बहरलेल्या बागा दिसतात. भाऊसाहेब झिंजाडे (शेतकरी) ९९२२८८६०६० रंगनाथ झिंजाडे (शेतकरी) ७४९८२६८०११

Lemon Trees
Sugarcane FRP : शेतकरी संघटनांकडून उसाला प्रतिटन पाच हजार रुपयांची मागणी

लिंबाने केले कर्जमुक्त गावात लिंबाची संस्कृती तयार होण्यापूर्वी नफ्याची शेती अशी दिसतच नव्हती. अनेक शेतकरी कर्जातच असायचे. लिंबाच्या शेतीतून कर्जातून बाहेर पडणे शक्य झाले शिवाय आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम झाले.

आज घरात कोणताही मोठा खर्च आला, पै-पाहुणे आले तरी लिंबाच्या ताज्या उत्पन्नामुळे गाठीला चार पैसे जास्तीचे राहू लागले आहेत. या पिकाने आम्हाला समाधान दिल्याचे शेतकरी रंगनाथ झिंजाडे,भाऊसाहेब झिंजाडे सांगतात.

लिंबाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मला चांगला नफा मिळतोच. शिवाय खरेदीच्या व्यवहारामुळे गावातील तरुणांना रोजगारही मिळाला असल्याचे सुधीर झिंजाडे सांगतात. शीतगृहाची उभारणी लिंबाचे वर्षभर उत्पादन मिळत असले, तरी अनेक वेळा दरांमध्ये मोठी घसरण होते.

त्यावर पर्याय म्हणून गावातील महिला शेतकरी मनीषा खराडे यांनी २० टन क्षमतेचे जैवइंधनावर (बायोगॅस) चालणारे शीतगृह उभारले आहे. दर पडतात त्या वेळी घरच्या लिंबांबरोबरच अन्य शेतकऱ्यांकडील लिंबांची खरेदी करून त्यांचीही साठवणूक त्या करतात. दर अपेक्षेप्रमाणे वाढल्यानंतर मग त्या विक्रीस नेतात. एक ते दोन महिन्यांपर्यंत या पद्धतीने लिंबू शीतगृहात ठेवता येतो.

कष्ट, प्रयत्न व सातत्यातून गावातील शेतकऱ्यांनी लिंबू शेतीत नाव कमावले आहे. त्यांच्यामुळे गावाचा लौकिक वाढला आहे. विकासकामांबरोबर सामाजिक आणि विधायक कामांनाही आमचे नेहमी प्राधान्य असते. विधवा प्रथा निर्मूलनाचे कामही गावाने केले आहे.
धनंजय झिंजाडे, सरपंच, पोथरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com