
डॉ. रामचंद्र साबळे
Maharashtra Winter Update : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.१९, २०) उत्तरेकडील भागावर १०१२ हेप्टापास्कल, तर दक्षिणेकडील भागावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होताच थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.१९, २०) दक्षिणेकडील भागावर हवामान ढगाळ राहील. मंगळवार ते शनिवार (ता. २१ ते २५) या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहील.
जेव्हा हवेच्या दाबात घसरण होते, तेव्हा कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असते. याशिवाय १५ जानेवारीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. दक्षिण गोलार्धातून सूर्याचे भ्रमण उत्तर गोलार्धाच्या दिशेने सुरू होते. त्यानुसार हळूवारपणे दिवसाचा सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढतो. त्यानुसार किमान व कमाल तापमान वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीचे प्रमाण कमी होत जाते. या कालचक्रानुसार थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली असून, हळूहळू धुक्याचे प्रमाणही कमी होईल.
गहू, हरभरा, रब्बी ज्वारी तसेच बटाटा, सुरण या पिकांना थंड हवामान मानवते. तर उसाच्या कांड्यात याच कालावधीत साखरनिर्मिती होते. तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी हे हवामान अनुकूल ठरते. सध्याचे हवामान रब्बी पिकांच्या वाढीसाठी अतिशय योग्य आहे.प्रशांत महासागराच्या इक्वेडोर या विषुववृत्तीय भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २४ अंश सेल्सिअस, पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस आहे. यावरून ‘ला-निना’चा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येते. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस असल्याने महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील.
कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तसेच रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
काही दिवशी आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहणे शक्य आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ८२ ते ८८ टक्के राहील. त्यामुळे पहाटे व सकाळी दाट धुके असेल. मात्र ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के राहण्यामुळे हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४५ ते ४८ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.१९, २०) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ५० टक्के, तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ५६ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील पूर्व भागातील व दक्षिणेकडील जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर, परभणी व जालना जिल्ह्यांत ४२ ते ४४ टक्के,
तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यांत ४५ ते ४८ टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत ३५ टक्के, तर धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत ३६ टक्के राहील. परभणी व लातूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व बीड जिल्ह्यात ताशी ८ कि.मी., लातूर, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी ९ कि.मी. व धाराशिव जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ५३ ते ५५ टक्के, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ५८ ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५२ ते ५४ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ४८ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ताशी १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत १२ ते १३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ५५ ते ६० टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५२ ते ५३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ ते ४० टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३३ ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग गोंदिया जिल्ह्यात ६ कि.मी., चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ८ कि.मी. व भंडारा जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के, तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांत ३६ ते ३८ टक्के, तर सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३० ते ३१ टक्के राहील. हवामान दुपारी कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला :
- सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.
- उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.
- गहू पिकास वाढीच्या अवस्थेनुसार दर २१ दिवसांनी पाणी द्यावे.
- हरभरा पिकास फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत सिंचन करावे.
- दोडका, घोसाळी, कारली या पिकांची लागवड करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.