
Nagpur News: विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात वाहनावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर भंडारा जिल्ह्यात पुरामुळे तब्बल ८५ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भात १२० पेक्षा अधिक मार्गांवर वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत असून काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. परिणामी, प्रशासनाने खबरदारीच्या उपायानांतर्गत जिल्ह्यात सहा शोध व बचाव पथके तैनात केली आहेत. भोजापूर गावात पुराचे पाणी शिरल्याने या गावात बचाव पथकाला पाठवीत ग्रामस्थांसाठी बचाव मोहीम राबविण्यात आली.
त्याकरिता बोटींचा देखील वापर करण्यात आला. भोजापूर ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. बेलाटोली गावात देखील पुराचे पाणी शिरले. १४ कुटुंबीयांना याची झळ पोहोचली. भंडारा येथील वैशालीनगर तसेच खात परिसर पूर्णपणे पाण्याखाली आला.
भंडारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. परिणामी अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात सुमारे ८५ पेक्षा अधिक मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामध्ये भंडारा-कारधा, खमारी-माटोरा, सोनेगाव-विरली, अड्याळ-विरली, मेंढेगाव-सातेपाटसह इतर मार्गांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात पुजारीटोला प्रकल्पातून १२२.६६ क्युसेक, संजय सरोवर २४६, गोसेखुर्द १४,९५६.३२, धापेवाडा प्रकल्पातून ९,७१५.१८ क्युसेक विसर्ग केला जात आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. कामठी तालुक्यातील पांढुर्णा गावात पाणी शिरले परिणामी या गावातील आठ व्यक्तींसाठी बचावकार्य राबवीत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहरातील अनेक परिसर जलमय झाल्याने एनडीआरएफ व एसडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाच्यास्तरावर बचावकार्य राबविले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात निम्न वेणा धरणाचे २१ गेट उघडण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातदेखील पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. या जिल्ह्यातील तब्बल १७ मार्गांवरील वाहतूक प्रशासनाने पुरामुळे बंद केली आहे. गडचिरोली-नागपूर मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन प्रवासी बस पाण्यात अडकून पडल्या होत्या. जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
या बसमध्ये अनुक्रमे ५० आणि २३ प्रवासी होते. यवतमाळ जिल्ह्यात देखील पूरस्थिती असून काही मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यालादेखील पावसाने झोडपले असून काही रस्ते बंद झाले आहेत. वर्धा, अमरावती, गोंदिया जिल्ह्यांत देखील पावसाची संततधार असून या भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी-कोहमारा मार्गावर धावत्या कारवर झाड कोसळले. या घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारच्या मागे दुसरे वाहन होते. परंतु त्यांनी वेळीच ब्रेक दाबल्याने त्यांना नियंत्रण मिळविता आले व दुर्घटना टळत त्यांचा जीव वाचला.
गोंदियामध्ये वाहनावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू
नागपुरात आपत्ती व्यवस्थापन पथकांची नियुक्ती
नागपूर विभागातील गोसीखुर्द धरणातून ३ लाख १७ हजार क्युसेकने वैनगंगा नदीमध्ये विसर्ग
नागपूर जिल्ह्यातील कुही येथे सर्वाधिक २७० मिमी पावसाची नोंद
नाशिक, सोलापूर, कोल्हापूरमध्ये पावसाची उघडीप
उर्वरित राज्यात जोर कमी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.