Maharashtra Weather Update : मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. आजही राज्याच्या काही भागात पाऊस झाला. पण उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. तर गुरुवारपासून राज्याच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव तसेच संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला होता.
उद्या म्हणजेच मंगळवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. उद्या मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील,असा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारीही राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे.
गुरुवारपासून विदर्भाच्या काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर शुक्रवारी विदर्भातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.