
Pune News : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी (ता. २३) रात्रभर या भागात जोरदार पाऊस कोसळला. राज्यातील सुमारे १३० मंडलांत अतिवृष्टी झाली. मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे पुण्यातील वडिवळे, कासारसाई, उजनी, वीर, घोड, राधानगरी, खडकवासला, कळमोडीतून वाढ करण्यात आली होती. नाशिकमधील गंगापूर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमीअधिक केला जात होता.
कोकणात पुन्हा मुसळधार
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आठ मंडलांत, तर रायगडमधील ४३, रत्नागिरीतील आठ मंडलांत, सिंधुदुर्गमधील पाच, पालघरमधील २६ मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे पुन्हा कोकणातील कुंडलिका, जगबुडी नदी ओसंडून वाहत असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या काठावरील रोहा, कोलाड, गोवे, पुई, वाकण, खारगाव, धटाव, तर जगबुडी नदीकाठावरील खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
घाटमाथ्यावर जोरदार
घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक वाढला आहे. ताम्हिणी घाटमाथ्यानंतर मागील चोवीस तासांमध्ये शिरगाव, दावडी, डुंगरवाडी, लोणावळा, वळवण, शिरोटा, आंबोणे, भिवपुरी, कोयना, खोपोली, खांड, भिरा या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत असून ओढे, नाले भरून वाहत असून नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.
मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोर
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. पश्चिम भागातील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. या पावसामुळे कळमोडी, वडिवळे, कासारसाई, खडकवासला अशा काही धरणांतून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कळमोडी धरण ९५ टक्के भरले आहे. पाऊस व येवा पाहता कोणत्याही क्षणी कळमोडी धरण शंभर टक्के भरून अनियंत्रित विसर्ग आरळा (भीमा) नदीमध्ये चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने गंगापूर धरणातून दुपारी विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडला असल्याने कण्हेर, वारणा, राधानगरी, तुळशी अशा धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत असून विसर्ग सोडण्यात येत आहे.
पाऊस दृष्टिक्षेपात...
रायगडमधील पेण येथे सर्वाधिक १५९ मिलिमीटर पाऊस.
कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस. मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप.
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी.
...या धरणांतून विसर्ग सुरू (क्युसेकमध्ये)
उजनी ३५,०००, दारणा ४७४१, गंगापूर ६१५९, हतनूर २५७८, वाघूर २०, खडकवासला ७७००, घोड ५५००, वीर ४६३७, कण्हेर १०००, राधानगरी ३१००, तुळशी ३००, येरळवाडी ९१४, वडीवळे ३९७७, कासारसाई २०४०, तिलारी जलविद्युत प्रकल्प ८१.
पूर्व विदर्भात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसाची उघडीप असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु विदर्भाच्या काही भागात ढगाळ वातावरण असून, अधूनमधून ऊन पडत आहे. आतापर्यंत या भागात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, भूजल पातळी खालावली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहे. तर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.