
Pune News : उत्तर भारतासह राज्याच्या बहुतांशी भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या दरम्यान होते. राज्यातील थंडी उद्याही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
उत्तर भारतात थंडीची लाट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाली. आज देशातील सर्वात किमान तापमानाची नोंद पंजाब येथे झाली. पंजाबमधील अदामपूर येथे १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर देशातील कमाल तापमान आज केरळमध्ये नोंदले गेले. केरळमधील कन्नूर येथे आज देशातील सर्वाधिक ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील काही भागात आज थंडीची लाट होती. बहुतांशी भागात आज तापमानातील घट कायम होती. धुळे येथील कृषी महाविद्यालयात आजही ४ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५.७ अंश सेल्सिअस तापमान होते. जेऊर येथे ५.५ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ५.६ अंश सेल्सिअस, मोहोळ येथे ६.८ अंश सेल्सिअस, नांदेड येथे ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात थंडी वाढल्याने रब्बी पिकांना दिलासा मिळत आहे. मधल्या काळात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पिकांवर त्याचा परिणाम होत होता. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान पुन्हा कमी होत आहे. तर आता थंडी चांगलीच वाढली. ही थंडी रब्बीच्या पिकांना पोषक मानली जात आहे. थंडी पुढील २ दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर असून ही स्थिती आणखी ठळक होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २ दिवसांमध्ये ही ठळक चक्राकार वाऱ्याची स्थिती तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.