
Pune News : राज्यात थंडीचा कडाका आणखी सात दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर राज्यात थंडी जाणवू लागेल. तर राज्यात पुढील ५ दिवस ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रावरील सध्याचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेव्हा बंगालच्या उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेतून आणि त्यामुळे वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून आर्द्रता महाराष्ट्राकडे लोटली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
तसेच सध्या गारपीटीचा काळ आहे. परंतु गारपीट तेंव्हाच होते जेंव्हा गारपीटीच्या वातावरणीय प्रणल्यांच्या कसोट्यांची पूर्तता व त्यांच्या एकत्रित घडामोडीची साध्यता होते. महाराष्ट्रात १ ते ५ फेब्रुवारी २०२५ होणाऱ्या पावसादरम्यान त्या पद्धतीच्या ठोस अश्या वातावरणीय प्रणाल्या सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे गारपीटीची शक्यता सध्या तरी जाणवत नाही.
सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये कमाल ३२ ते ३५ तर किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या ३ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक आहेत.
त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, महाबळेश्वर कोल्हापूर सातारा सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील दुपारी ३ चे कमाल व पहाटे ५ चे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढलेले आहे.
जळगावसह खान्देशांतील तीन जिल्ह्यात मात्र उष्णता विशेष अशी अत्याधिक जाणवत नाही. तर मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यांत कमाल २९ ते ३२ आणि किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहे.
वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यासक ग्लोबल वार्मिंग शी जोडून मोकळे होतात. प्रत्यक्षात सध्याची तात्पुरती वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात उष्णता जाणवत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून ठराविक दिशा न घेणारे वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन सध्या महाराष्ट्रावर चालू आहे.
हवेचा पुर्वो-पश्चिम कमी दाबाचा आस जरी महाराष्ट्रावर काहीसा जाणवत असला तरी एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा कल हा घड्याळ काटा दिशेने असल्यामुळे रात्रीची बाहेर पडणारी दिर्घ-लहरी उष्णता पूर्णपणे बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे निरभ्र आकाश असूनही सध्या अत्याधिक संचित उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे.
पुढील ५ ते ६ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात होणाऱ्या ह्या वाढीमुळे थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते, असेही श्री. खुळे यांनी सांगितले. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे वाहत आहे. त्यामुळे ह्या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे समजू नये, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.