Team Agrowon
किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. आज (ता. ३०) राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, बुधवारी (ता. २९) हरियानातील नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात पहाटे धुक्याची चादर कायम आहे. किमान तापमान कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. २९) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित राज्यात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा घामटा काढत आहे.
बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जेऊर, सोलापूर, अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा ३५ अंशांपार आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. ३०) राज्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (ता. १) पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.