
Pune News : मे महिन्यात विक्रमी कोसळलेल्या पावसाने जून महिन्यात देखील सरासरी ओलांडली आहे. जून महिन्यात राज्यात २२२.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीइतका (१०६ टक्के) पाऊस पडला आहे. पावसाने सरासरी गाठली असली, तरी पावसाचा वितरण मात्र असमान आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मराठवाड्यात दडी मारली असून, विदर्भात पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केरळसह महाराष्ट्रात मॉन्सून विक्रमी वेळेत दाखल झाला. जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापल्यानंतर मॉन्सूनची चाल थांबल्याने पावसातही खंड पडला. यातच मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या दमदार सरी कोसळतच होत्या. तर राज्याच्या अंतर्गत भागात मात्र पावसाची दडी कायम असल्याचे दिसून आले. जूनच्या अखेरच्या टप्प्यात मात्र विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.
यंदा २००९ नंतर तब्बल १७ वर्षांनी मॉन्सून वेगाने २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. तर सर्वसाधारण वेळेच्या ९ दिवस आधी २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. महाराष्ट्रात वेळेआधी पोचल्यानंतर वाटचाल अडखळल्याने मध्य भारतात मात्र मॉन्सून काहीसा उशिराने पोहोचला. २५ मे रोजी तळकोकणात आलेल्या मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापायला १७ जूनपर्यंत वाट पहावी लागली. जून महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन आणि अरबी समुद्रात दोन अशा पाच कमी दाब प्रणाली तयार झाल्या. या प्रणाली १३ दिवस सक्रिय होत्या.
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास वेगाने झाल्याने जून महिन्यातच मॉन्सून देशात सर्वदूर पोहोचला आहे. यातच जून महिन्यात देशात १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा १८० मिलिमीटर पावसाची नोंद होत सरासरीपेक्षा अधिक (१०९ टक्के) पर्जन्यमान झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण देशातील पावसाचा विचार करता कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टीचे प्रमाण अधिक होते.
मध्य महाराष्ट्रात अधिक, मराठवाड्यात कमी पाऊस
राज्यातील विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक ३५ टक्के पाऊस झाला आहे. तर मराठवाडा विभागात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला असून, मराठवाड्यामध्ये पावसात ४१ टक्क्यांची तूट दिसून येत आहे. तर कोकणात पावसाने सरासरी ओलांडली आहे. विदर्भात पावसाने सरासरी गाठली असली तरी पावसात १२ टक्क्यांची तूट दिसून येत असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.
नाशिकमध्ये सर्वाधिक, बीडमध्ये सर्वांत कमी
जून महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या घाटमाथ्याकडे पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आहे आहे. यामुळे नद्यांना पूर येण्याबरोबरच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जून अखेर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तेथे सरासरीच्या तुलनेत १०५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर ठाणे, रायगड, पालघर, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. तर बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाला असून, तेथे पावसात सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के तूट असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय जालना, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आहे. मराठवाडा आणि उत्तर विदर्भासह अहिल्यानगरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाकडील नोंदीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत)
सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांपेक्षा अधिक)
पालघर, नंदूरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर.
सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक)
ठाणे, रायगड, बुलडाणा.
सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक)
रत्नागिरी, मुंबई, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
सरासरीपेक्षा कमी (उणे २० ते उणे ५९ टक्के)
सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
सरासरीच्या तुलनेत अपुरा (६० टक्क्यांपेक्षा कमी)
सोलापूर, बीड, जालना, हिंगोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.