
Wardha News : सिंचन सुविधांमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने सिंचन विहिरींना प्राधान्य दिले जात आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून मस्टरच नसल्याने आर्वी तालुक्यात मनरेगामधील ३०० विहिरींचे काम रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.
२०२२-२३ या वर्षात आर्वी तालुक्यात २३६ विहिरींना मंजुरी देण्यात आली. परंतु त्यांचे काम रखडले आहे. अनेक शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्याने त्यांनी जवळच्या पैशाने खोदकाम सुरू केले. परंतु मस्टर निघणे बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
खोदकामाचे संपूर्ण पैसे मस्टरद्वारा निघत असल्याने मस्टरच मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. मस्टरच्या माध्यमातून कुशल आणि अकुशल कामगारांचे वेतन मनरेगातून काढले जाते. मात्र ही प्रक्रियाच ठप्प असल्याने विहिरींच्या अनुदानाविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज किंवा उसनवारी करून विहिरींच्या बांधकामासाठी पैशाची जुळवाजुळव केली. आता अनुदान आणि कामही रखडल्याने अस्वस्थता वाढीस लागली आहे.
पंचायत समिती सूत्रांनी जुन्या व नवीन मिळून ३०० विहिरींचे काम अर्धवट असल्याची माहिती दिली. परिणामी एका चांगल्या योजनेच्या अंमलबजावणीला अशाप्रकारे खीळ लागली आहे.
खोदकामाचे अकुशल कामाचे देयक हे मस्टरद्वारे काढले जाते. मस्टरवर रोजगार सेवक, ग्रामसेवक यांची स्वाक्षरी असल्याशिवाय ते ऑनलाइन होत नाही. ही प्रक्रिया होताना अनेक अडचणी येत आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य द्यावे, अशी मागणी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.