
पुणे : ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन (Jaljeevan Mission) हाती घेतले असून, २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
अमृत अभियानातून (Amrut Abhiyan) शहरी भागातील नागरिकांना पाणी पुरवण्यासह (Water Supply Scheme) त्यांचे जीवनमान उंचावण्यासासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या दोन्ही अभियानांच्या पूर्णत्वासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अधिकारी, अभियंता असा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.
इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचा समारोप आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला.
त्यावेळी ते बोलत होते. हडपसर येथील मेस्से ग्लोबल सेंटर (लक्ष्मी लॉन्स) येथे झालेल्या समारोपावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, ‘आयवा’चे अध्यक्ष इंजि. सुभाष भुजबळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. मथियालगन, राष्ट्रीय महासचिव इंजि. डॉ. दयानंद पानसे, संयोजन समिती सचिव व अधीक्षक अभियंता इंजि. वैशाली आवटे, आयवा पुणेचे सचिव के. एन. पाटे, डॉ. पराग सदगीर आदी उपस्थित होते.
आयुष प्रसाद म्हणाले, की केंद्र व राज्याने आणलेल्या योजना राबविताना अभियंत्यांनी नावीन्याची कास धरावी. पाणी गळती, ऊर्जेचा अल्प वापर यावर विचार केला पाहिजे. जलस्रोत संवर्धन व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ‘एआयसीटीई’च्या सहयोगाने पाणी व्यवस्थापनात काम करणाऱ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा.
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
अतुल कपोले म्हणाले, की पाणी वाटपात समानता, शाश्वतता याचा विचार ही चांगली बाब आहे. ग्रामीण व शहरी भागात नियोजन करताना तेथील घटकांचा विचार करावा. सगळ्या घटकांच्या विचाराअंती नियोजन केल्यास योजना यशस्वी होईल.
पाणीपुरवठा योजनांबरोबरच मलनिःस्सारण व सांडपाणी नियोजन व्हायला हवे. नद्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. योजनांच्या यशामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
सुभाष भुजबळ म्हणाले, की तीन दिवसांच्या या अधिवेशनात पाणीपुरवठा, स्वच्छता, जल जीवन मिशन, अमृत अभियान अशा सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे.
आगामी काळात या क्षेत्रात काम करत असलेल्या घटकांना अधिवेशनात आलेल्या सूचना मार्गदर्शी ठरतील. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आयवाचे व विविध महाविद्यालयांचे सर्व प्रतिनिधींनी मेहनत घेतली.
अनिल कुलकर्णी, माधवी गरुड, राजेंद्र आंटद, अनंत नामपूरकर, कीर्तिकुमार गुरव, प्रिया माळी, राजेश कुलकर्णी, पराग कश्यप, एन. एन. भोई, धनंजय जगदाने, प्रशांत बनसोडे, गणेश चंदनशिवे, दीपक म्हस्के आदी सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
के. एन. पाटे यांनी स्वागत केले. डॉ. दयानंद पानसे यांनी प्रास्ताविक केले. गायत्री राव यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली आवटे यांनी आभार मानले.
या वेळी उत्कृष्ट रिसर्च पेपर, पोस्टर सादर करणाऱ्यांचा, तसेच उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सन्मान करण्यात आला. पुढील वर्षीचे अधिवेशन कोईमतूरला होणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.