
औरंगाबाद : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जल जीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) अनुषंगाने ग्रामसभेमध्ये (Gramsabha) कामाची माहिती दिली जावी व चर्चा विनिमय करण्याची सूचना राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
देशभरात केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०१९ पासून जलजीवन मिशन हा एक महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
प्रकल्पांतर्गत ‘ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे (५५ लिटर प्रति माणसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरूपात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत राज्यात सर्व ३४ जिल्ह्यांतील १ कोटी ०६ लाख १० हजार ७२० (७२.३१ टक्के) कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे.
तसेच मार्च २०२४ अखेरपर्यंत संपूर्ण राज्य ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. प्रकल्पास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने २६ जानेवारी, २०२३ रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशनसंदर्भात कामांच्या बाबतीत वाचन व चर्चा विनिमय करण्याची सूचना करण्यात आली आहे.
ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून विशेष स्थान देण्याचे व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करावे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित महिलांना सभेस आमंत्रित करून सन्मानित करण्यात यावे.
पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल असे पहावे, असे स्पष्ट केले आहे. तसेच केलेल्या कृती विषयी ६ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
सूचनापत्रातील महत्त्वाच्या बाबी
१) ज्या ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रीय तपासणी संच (एफटीके) पोहोचलेले नसतील ते पोहोचवा.
२) पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती ग्रामसभेमध्ये समजवा.
३) ज्या ग्रामपंचायतीत क्षेत्रीय तपासणी संच उपलब्ध असतील त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घ्या.
४) जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती द्या चर्चा करा.
५) योजनेअंतर्गत समुदायाचा वाटाबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणा.
६) भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे ‘हर घर नल से जल’म्हणून घोषित करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
७) योजना शाश्वततेच्या दृष्टिने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करा.
८) जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची माहिती दर्शविणाऱ्या समूह माहितीफलकांबाबत ग्रामसभेला अवगत करा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.