
Satara News : यंदा अवघ्या एक रुपयात पीकविमा काढता येत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची त्याबाबत उदासीनता दिसत आहे. नऊ लाख तीन हजार शेतकऱ्यांपैकी केवळ नऊ हजार ६०० शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे.
खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न झाल्यास संबंधित विमाक्षेत्र घटक पीकविमा अंतर्गत नुकसान भरपाईस पात्र राहणार आहे.
पेरणीनंतर ३० दिवस व काढणीच्या १५ दिवस अगोदर पूर, पावसातील खंड, दुष्काळामुळे अपेक्षित उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यास क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.
पीक काढणीनंतर दोन आठवड्यांत गारपीट, चक्रीवादळ, बिगरमोसमी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल.
भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.
ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांसाठी उत्पादनाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित केली जाते. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती झाल्यास पीकविमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल. लवकर पीकविमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
३१ जुलैपर्यंत मुदत...
एक रुपयात पीकविमा या योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. शेतकरी विमा संरक्षणासाठी वेबपोर्टलद्वारे थेट अर्ज करू शकतील. त्यासाठी पीकविमा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केला आहे.
विमा हप्त्याची रक्कम ही पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन भरावयाची आहे. अर्ज संकेतस्थळावर पूर्ण भरल्यानंतर क्रमांकासह पोहोचपावती मिळेल. शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरही एसएमएसद्वारे सूचित करण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.