
Latur News : जिल्ह्यातील एसबीआय जनरल पीकविमा कंपनीचे कार्यालयात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. ९) चांगलाच राडा घातला. खुर्च्यांची तोडफोड करत अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिल्याने हा मनसे स्टाईल राडा घातल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले आहे.
श्री. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बुधवारी लातूर येथे एसबीआय जनरल पीकविमा कंपनी कार्यालयात गेले होते. विमा कंपनीचे जिल्ह्यातील कार्यालय बंद आहेत, मग शेतकऱ्यांनी तक्रार देण्यासाठी जायचे कुठे याचा जाब विचारला असता एसबीआय विमा कंपनीचे व्यवस्थापक सुशीलकुमार तिवारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.
लातूर जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीसंदर्भात शेतकरी पीकविमा तालुका कार्यालयात तक्रार देण्यासाठी हेलपाटे घालत आहेत.
परंतु एसबीआय जनरल पीकविमा कंपनीची जिल्ह्यातील सर्व कार्यालये बंद असल्याने नुकसानीची तक्रार कोठे द्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एसबीआय जनरल विमा कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे नुकसान होऊनही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप मनसेने केला.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते, असे नागरगोजे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.