
खारघर : पनवेल शहर ग्रामीण; नवी मुंबई परिसरातील निराधार, कमी उत्पन्न (Low Income) असलेल्या; तसेच अन्य वर्गातील नागरिकांना प्रति किलो तीन, दोन आणि एक रुपयांना मिळणारे धान्य आता १ जानेवारीपासून मोफत (Free Grain) मिळणार आहे. वर्षभर मोफत धान्य मिळणार असल्याने पनवेलमध्ये ७२ हजार; तर नवी मुंबई परिसरातील ५४ हजार कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार आहे. त्या कुटुंबीयांच्या खिशावरील आर्थिक भारही कमी होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत रेशन कार्डधारकांमधील पात्र लाभार्थींना तीन रुपये प्रति किलो तांदूळ आणि दोन रुपये प्रति किलो दराने ३५ किलो धान्य दिले जाते. २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांवर आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली.
या परिस्थितीत गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दिले जात होते.
ही सेवा बंद करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत २०२३ या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने ३० डिसेंबरला एक परिपत्रक काढले आहे.
१ जानेवारीपासून अंत्योदय, प्राधान्य कुटुंबासह अन्य प्रकारातील वर्गांना सरसकट मोफत धान्य मिळणार आहे. ही योजना डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर असलेले आर्थिक ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. लाभार्थी कुटुंबांना या पुढील एक वर्ष मोफत धान्य मिळणार असून, पनवेलमध्ये ७२ हजार, तर नवी मुंबई शहरात ५४ हजार कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
अनेकांची आर्थिक बचत होणार
पनवेल परिसरातील दऱ्या डोंगरातील आदिवासी पाडे, खेडेगावातील गरीब, शहरी कुटुंब तसेच नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी, दगडखाण कामगार, नाका कामगार आणि संघटित कामगार कुटुंबीयांच्या खिशावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.