World Water Day : जागतिक जलदिनाचं महत्व काय?

वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरचा ताण वाढला आहे. त्यातून आपली गरज भागताना दिसत नाही.
World Water Day
World Water Day Agrowon

Water Day : आज २२ मार्च जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा चटका वाढत असताना राज्याच्या काही भागातून पाणीटंचाईच्या बातम्या येत होत्या.

दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानात अचानक बदल होऊन वादळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली, ती अजूनही (मार्चच्या चौथ्या आठवड्यात) चालूच आहे.

या गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील जवळपास दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मनुष्यप्राण्यांपासून जवळपास सर्व सजिवांचा जीव पाण्याविना कासावीस होतो. अर्थात त्यांना पिण्यासाठी पाणी लागते.

पिकालाही पाणी कमी झाले तर ते कोमेजतात. शेती-पिण्यासाठी तर पाणी पाहिजेतच परंतु कोणताही उद्योग-व्यवसाय पाण्याशिवाय चालत नाही. मानवी अस्तित्व, आर्थिक विकास तसेच प्रत्येकच देशाच्या समृद्धीसाठी पाणी आवश्यकच आहे.

त्यामुळेच तर पाण्याला जीवन, प्रगतीचे इंधन असेही संबोधले जाते. आज आपण पाहतोय संपूर्ण जगभर पाण्याचे संकट आहे. काही देश दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त तर इतर काही देश महापुराने त्रस्त आहेत. भारत देशातही कधी महापूर तर कधी दुष्काळ अशी स्थिती असते.

मागील तीन-चार वर्षांपासून तर पावसाळ्यात महापूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा देशाला बसत आहेत. अर्थात भारतासह जगभर पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. हेच यातून स्पष्ट होते.

World Water Day
Water Project : पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांच्या नशिबी यातना

यावर्षीच्या जल दिनाची संकल्पना ही पाण्याच्या संकटातून मुक्तीसाठी व्यवस्थेमध्ये गतिमान बदल करा, अशी आहे. अर्थात ही संकल्पना जागतिक जलसंकट टाळण्यासाठी सर्व देशांनी जलव्यवस्थापनात मोठे बदल करून ते तत्काळ कृतीत उतरविणे गरजेचे असल्याचीच जाणीव करून देते.

पृथ्वीचा ७१ टक्के भाग जलव्याप्त असला तरी त्यांपैकी केवळ २.५ टक्केच पाणी ताजे, गोड, स्वच्छ अर्थात मानवाला पिण्यायोग्य आहे. आपल्या गरजेपुरते ताजे पाणी स्थिर ठेवण्यासाठीची पृथ्वीतलावर नैसर्गिक प्रक्रिया आहे.

परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरचा ताण वाढला आहे. त्यातून आपली गरज भागताना दिसत नाही.

अधिक गंभीर बाब म्हणजे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत आपण प्रदूषित केले आहेत, त्यांना ओरबाडून आपली गरज भागविण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. गेल्या वर्षी भारत सरकारच्या नीती आयोगाचा एक अहवाल आला.

भविष्यात दिल्ली, बंगळुरु, हैद्राबाद या भारतातील शहरांतील भूजल संपून तेथील लोकांना पाण्याविना जीवन जगण्याचे संकट ओढवेल, असा हा अहवाल सांगतो. आत्ताच देशभर मागणीच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा कमी आहे.

World Water Day
Water Scheme : पाणी बचत करणाऱ्या योजना अंमलात आणायला हव्या

२०३० मध्ये तर पाण्याच्या मागणीत दुप्पटीने वाढ होणार आहे. जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के लोकसंख्या भारताची असून जगातील पाणीसाठ्यापैकी केवळ ४ टक्के पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे.

अशा एकंदर परिस्थितीत आपण पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर आपल्यावरील जलसंकटाची कल्पनाच न केलेली बरी! देशभरात पडणारा पाऊस अधिकाधिक भूगर्भात कसा जिरेल, हे पाहायला हवे. वाहून जाणारे अधिकाधिक पाणी भूपृष्ठांवरील जलसाठ्यांत साठवून ठेवण्याचेही नियोजन झाले पाहिजेत.

शहरातील तसेच उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरावर भर द्यावा लागणार आहे.

सिंचनासह इतरत्रही होणारी पाण्याची गळती पूर्णपणे थांबवावी लागेल. असे झाले तर सध्याच्या वापरातील जवळपास ४० टक्के पाण्याची बचत होईल. गावातील बारवापासून ते नदीपर्यंत सर्व जलस्रोत जिवंत ठेवायला हवेत.

त्यांच्यावरील अतिक्रमण हटवून ते प्रदूषित होणार नाहीत, ही काळजी देखील घ्यावी लागेल. हे करीत असताना सर्वांकडून पाण्याचा कार्यक्षम वापर होईल, हे पण पाहावे लागेल. असे केले तरच आपल्यावरील जलसंकट टळेल, अन्यथा ‘पाणी पाणी रे...’ करण्याची वेळ सर्वांवर येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com