Water Scarcity : आडातच नाही, तर...

Water Issue : जल जीवन मिशन अंतर्गत सर्वांच्या घरांना नळ जोडण्या यथावकाश मिळतीलही. परंतु त्या नळाला पाणी येण्यासाठी गावपरिसरात जल स्रोत जिवंत असायला पाहिजेत ना!
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Water Shortage : उष्णतेच्या तीव्र लाटांनी संपूर्ण देश होरपळून निघतोय. त्यातच मे महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशभरातील बहुतांश शहरे तसेच ग्रामीण भागात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या कमी पाऊसमानामुळे नद्या, विहिरी, तलाव, धरणे हे जलसाठे आटले आहेत.

केंद्रीय जल आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील महत्त्वाच्या ५० धरणांमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यावरून देशात पिण्याच्या पाण्याची स्थिती किती चिंताजनक आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे. राज्याच्या दुष्काळी भागात तर अजून भयावह परिस्थिती आहे. मोठी गावे, शहरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Water Scarcity
Water Fodder Scarcity : जनावरांना चारा मिळेना, ना उपलब्ध होई पाणी

अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पुरवठा होत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठीची खरी दुर्दशा ग्रामीण भागातील गाव-खेडे-वाड्या-वस्त्यांत पाहावयास मिळतेय. अशा ठिकाणी टॅंकर पोहोचले नसल्याने तेथील महिलांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक महिला जीव धोक्यात घालून पिण्यासाठी पाण्याची कशीबशी सोय करीत आहेत. एकीकडे हे असे वास्तव असताना दुसरीकडे मात्र ‘हर घर नल से जल’ या योजनेची टीव्हीवर धूमधडाक्यात जाहिरात सुरू आहे.

पाणी हेच जीवन. पाणी मिळविण्यासाठी करावे लागणारे कष्ट, सोसावी लागणारी पीडा, वाया जाणारा पैसा आणि आयुष्य याची गणतीच होऊ शकत नाही. आपल्या पूर्वजांनी ‘उदक राखावे युक्तीने’ असे सांगितले आहे. आपण ते आचरणात आणत नाही. त्यामुळेच पाण्यासाठी दाही दिशा अशी आपली दशा होऊन बसली आहे. केंद्र सरकारने ‘हर घर जल’ असा नारा देत २०१९ मध्ये जल जीवन मिशन सुरू केले.

त्यात त्यांनी नंतर २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले. पाणी हा राज्याचा विषय असल्याने सर्व घरांना नळाद्वारे पाण्याची योजना तयार करून त्याची अंमलबजावणीही करायची जबाबदारी केंद्राने राज्यांवर टाकली. यात तांत्रिक आणि वित्तीय साह्य मात्र केंद्र सरकारचे आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या योजनेची प्रभावी आखणी, अंमलबजावणी होताना दिसत नाही.

जल जीवन मिशनला लोकचळवळीचे स्वरूप यायला पाहिजे, असेही ठरले. परंतु जल जीवन मिशनच्या कार्यवाहीत गाव सहभाग आढळून येत नाही. त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेत. या मिशन अंतर्गत सर्वांच्या घरांना नळ जोडण्या यथावकाश मिळतीलही. परंतु त्या नळाला पाणी येण्यासाठी गारपरिसरात जल स्रोत जिवंत असायला पाहिजेत.

Water Scarcity
Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

आडातच नसेल तर पोहऱ्यात पाणी येईल कुठून? आज आपण गावपरिसरातील नैसर्गिक झरे, ओहोळ, बारव, तलाव, नद्या यांवर अतिक्रमणे करून, त्यांना प्रदूषित करून मृतवत केले आहे. धरणे गाळाने भरलेली आहेत. त्यातही पाणीसाठा कमीच होतो. त्यामुळे पाण्याच्या या स्रोतांत, साठ्यांतच पाणी नाही, तर मग नळाला पाणी येणार कुठून?

देशाचा विचार करता दरवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडतो. परंतु त्या पडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन आपल्याकडून होत नाही. या वर्षी चांगल्या पाऊसमानाचा अंदाज आहे. पडलेल्या पावसाचे अधिकाधिक पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी, जलसाठ्यांत साठविण्यासाठी शासनापासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काय प्रयत्न केले जात आहेत?

तर फारसे काही नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. असे असेल तर मग मॉन्सूनच्या चांगल्या पाऊसमानानंतरही पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली तर नवल वाटायला नको. सध्या भीषण पाणीटंचाईत आपण फक्त मानवाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा विचार करतोय, शेती, जनावरे, उद्योग-व्यवसाय याला लागणाऱ्या पाण्याचे काय, याचाही विचार झाला पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com