
‘‘साहित्य क्षेत्रात माझी मूळ आणि आवडती भूमिका ही रसिक वाचकाची आहे; आणि मला वाटते, की ही वाचकाची भूमिका खऱ्या अर्थाने स्पर्धातीत व टिकून राहणारी भूमिका आहे. शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशाली कार्य जसे शब्द करतात, तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळवण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे.
कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे. तर मी ज्या कार्यक्षेत्रात गेली जवळ जवळ पन्नास वर्षे क्रियाशील आहे, त्या राजकारणाचेही प्रमुख माध्यम शब्दच आहेत. या अर्थाने साहित्यिक व राजकारणी शब्दबंधू आहेत. शब्दांचे आणि आमचे साहचर्य व सौहार्द पुराणे आहे. साहित्याच्या क्षेत्राशी काही नाते सांगायचे असेल, तर एवढेच आहे.’’
साहित्यिकांचा शब्द प्रामाणिक आणि प्रमाण समजून तसेच लेखनकर्त्यांचा सादर राखून शब्दांचे अर्थ वरीलप्रमाणे अर्थवाही करणारे यशवंतराव चव्हाण कालातीत शब्दांचे शब्दधनी आहेत. मानवेंद्रनाथ यांचे विचार त्यांच्या शब्दांचा पाया होता. कवी ना. धों. महानोर त्यांचे आवडते कवी तर कवी सुधाकर गायधनी यांच्या कवितेच्या ओळी त्यांना लागू होणाऱ्या आहेत. ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांच्यासह अनेकांशी त्यांची शब्दनाळ जुळलेली.
अनेक राजेशाही आल्या व गेल्या आणि अनेक राजकारणी आले; येत राहतील आणि जातीलही; पण यशवंतरावांसारखे सुसंस्कृत राजकारणी राजकीय वैश्विक पातळीवर विचारांचे पालनकर्ते म्हणून आदर्श आणि आधार असतील. त्यांच्या ‘सह्याद्रीचे वारे’, ‘ऋणानुबंध’, ‘कृष्णाकाठ’, ‘भूमिका’ ग्रंथातील त्यांचे विचार हे शब्दांचे विश्व सजग करणारे आणि समाधानी आहेत.
ते म्हणतात, ‘जाणता प्रश्न’ मी कधी केलेला नाही. छत्रपती शिवरायसुद्धा ‘हे राज्य रयतेचे मानायचे’. ते खरोखर रयतेचे राजे होतेच. त्यांची गुणसंपदा जाणून जाणतेपणाने यशवंतरावांनी आपली राजकीय बांधणी सामाजिक कार्ये यशस्वीपणाने पार पाडून केलेली आहे. आज अनुभवाअभावी असलेले आसनस्थ आणि त्यांचे आधारहीन व कार्येहीन अनुयायी यांचा आनंदी आनंद आहे. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्य आणि विचारपूर्वक कृतीचे मानदंड आहे.
यशवंतरावांचे सदैव स्मरण करणाऱ्यांनी त्यांच्या विचारांचे अर्थ शोधले पाहिजेत. त्यांची विचारधारा आणि कार्यधारा मानवी जीवन फुलवणारी - समृद्ध करणारी ‘कार्यशाळा’ आहे. ते वेळोवेळी सभ्यपणे व्यक्त होत असत. म्हणून ते ‘सुसंस्कृत’ ठरले. राजकारणाला असंस्कृत मानणाऱ्यांनी त्यांची राजकीय संस्कृती आणि संस्कारित व्यक्तिमत्त्वाला सलाम त्याकरिताच केलेला आहे.
राजकीय मंचावर तसेच राज्याच्या आणि राष्ट्राच्या सभागृहात विचारवंत मांदियाळीची मालिका साकार करण्यात ते अग्रस्थानी होते. त्यांनी लोकमनाचा विचार करून खेड्यापाड्यातील व शहरातील सर्वसामान्य लोकांच्या मुलांकरिता शाळा काढल्या, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक फीस सवलत दिली. धरणे बांधून शेतकऱ्यांच्या रानात समृद्धी केली, सहकाराच्या माध्यमातून उद्योगधंद्यांचा पाया घातला.
सत्तेचे विकेंद्रीकरण गाव, तालुका, जिल्हा ते राज्यापर्यंत केले, त्या काळी महिलांना स्थानिक राजकारणात संधी दिली. आजही ग्रामीण भागातील घटकांसाठी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’ ही सरकारी सर्वोत्तम निवाऱ्याची सोय आहे. त्यामुळे यशवंतराव कालातीत ‘काळकुळाचे विवेकतीर्थ’ आहेत. प्रगत महाराष्ट्र
घडविणारे चव्हाणसाहेब सर्वांसाठी ग्रेटच!
मुंबईतील ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ विकासाचे केंद्रच आहे. मनाचे ऐकण्यापेक्षा, जनाचे म्हणणे ऐकून त्यांनी निर्णय घेतले आणि जनतेची भाषा शासन निर्णय प्रक्रियेत तोलामोलाची केली. कारण जनता आपली अंतिम मालक असते आणि आपण लोकसेवक आहोत या न्यायाने ते आचारशीलवंत होते. बाप गेल्यावर घरात मोठा म्हणून कारभार पाहताना कारभाऱ्याला सदोदित घरातल्या माणसांचे मत ध्यानात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात.
आपणास हे अनुभवातूनही कळते. ते म्हणायचे, ‘जगातले मोठेपण चालते, पण घरातले लहानपण फार मोठे असते, हा माझा अर्धशतकाचा अनुभव होता.’ विश्वात यशवंतराव विख्यात आहेत. पण घरातल्या अर्थातच, देशाच्या माणसांचे ऐकून कामगिरी करणारे ते कारागीर लहानपणा घेऊन मोठे झालेले आहेत. ‘हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला’ यातच सर्व काही आलेले आहेच.
आज एका राष्ट्रात - एकेका राज्यात आपापले मत विचारांअभावी मोठेपणा विस्कटून टाकतात. यशवंतरावांच्या वागण्या - बोलण्यात एकजिनसीपणा होता. ते भारतीय संविधानाप्रमाणे राजकीय कामकाज तंतोतंत पार पाडत कारण जनतेचे सार्वभौमत्व संविधानात आहे. संविधान आणि सहेतुक विधान आज गरजेचे आहे पण आजचे वास्तव असे नाही.
यशवंतरावांच्या घराशेजारी कुलसुम दादी राहायची. ती म्हणे, वाईटाला वाईट म्हणून सांगताना फटकारून बोलायची. तेव्हा यशवंतरावांची आजी तिला सांगायची, ‘कुलसुम, आपण गरीब माणसं, दुसऱ्याबद्दल असं कशाला बोलायचं?’ तर ती म्हणे, ‘तो क्या हुआ? अगं आबई, जे वंगाळ, ते वंगाळच?’ आणि यशवंतरावांकडे वळून म्हणायची, ‘क्यूं बेटे, अपनेकू किसका डर है?’ कुलसुम दादी सत्य सांगून यशवंतरावांना निर्भय करून गेली. आज मात्र ‘म्हातारी मेली याचे दुःख नाही, पण काळ सोकावलेला आहे.
’ आज सगळे दमदार आहेत. हे राजकीय पिढीतील अंतर बोलके आहे. यशवंतराव आणि आजच्या राज्यकर्त्यांत हा फरक आहे. यशवंतराव, ‘लोकमानसाच्या काचेत आपले प्रतिबिंब’ न्याहाळण्याची आस होती. आता आपण सोडून दुसरीकडे सगळेच जण बोट दाखवत आहेत. लोकशाहीत घराणेशाही नांदताना दिसते. राजकारण रांगतेय. यशवंतराव म्हणजे ‘सामाजिक माणुसकीची सनद’ आहे. गुणिजन ती सनद लक्षात ठेवून वागतात. ही जनतेची मनातली शब्दवंदना आहे.
विठाई आणि वेणूताई
यशवंतरावांना पाठभिंत म्हणून वेणूताईंचा सहवास लाभला. त्यांना स्वतःचे लेकबाळ नव्हते. यशवंतरावांनी दुसरा विवाह करावा, असे वेणूताईंनी सुचविले. त्यांचे जिवलग आबासाहेब वीर यांनीही, दुसऱ्या लग्नाविषयी विचार करा म्हणून सांगितले. त्या वेळी आबांना यशवंतराव म्हणाले, ‘‘मला ‘वेणू‘ नावाचा मुलगा आहे.’’ वेणूताई यशवंतरावांच्या पत्नी असूनही ‘ताई’ होत्या आणि मुलगा ‘वेणू’ ही. ‘वेणू’ म्हणजे बासरी. त्या बासरीचा आवाज यशवंतरावांनी जाणला. ‘महाराष्ट्रातून दिल्लीला या’, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हटल्यावर ‘मला वेणूला तरी विचारू द्या’, असे यशवंतराव म्हणाल्यावर नेहरूही खळाळून हसलेले आहेत. आपण या आत्मबंधनामुळे त्या उभयतांना मानतोच. आजही राजकारणात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
विठाई यशवंतरावांच्या आई. त्यांना सर्व जण आक्का म्हणत. यशवंतराव सांगतात, ‘आक्काचं नाव देवाचं आहे. ‘विठाई’ आपला देव आहे.’ विठाई म्हणायच्या, ‘‘नका बाळांनो डगमगू चंद्र - सूर्यावरील जाई ढगू.’’ मातेचे शब्द मोल जाणून यशवंतराव कुठेही - कधीही डगमगलेले नव्हते. अख्ख्या आयुष्यात आपल्या जिंदगानीवर कुठलाही काळा ढग नोंदू दिला नाही. माईचे देवपण यशवंतरावांनी निर्मळ कृतीतून शाबूत ठेवले. शब्द खरे करणारे यशवंतराव गेले ते १९८४ मध्ये, पण ते अभिवादनास अजरामर आहेत.
(लेखक रानमेवा शेतकरी साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.