
alternative sources : सध्या आपल्या देशात ८० टक्के इथेनॉल हे साखर उद्योगापासून तर केवळ २० टक्के इथेनॉल हे खराब धान्य तसेच मक्यापासून तयार केले जाते. अर्थात खराब धान्य व मक्यापासून इथेनॉलनिर्मितीत अजूनही फार कोणी रस दाखवताना दिसत नाहीत. त्यामुळे खराब धान्य व मक्यापासून इथेनॉलला तेल उत्पादक कंपन्यांकडून प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिलिटर पाच ते सहा रुपये जास्त दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशात सध्या १२०० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. परंतु प्रत्यक्ष उत्पादन यापेक्षा खूप कमी (८६० कोटी लिटर) होतेय. पेट्रोलमध्ये सध्या आपण १० ते ११ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण करतो. अर्थात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला इथेनॉल उत्पादन दुपटीहून अधिक वाढवावे लागेल. कारण पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी आपल्याला १७०० ते १८०० कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. सध्या आपण उसापासून (मळी, रस, साखर शिरप) यांपासून इथेनॉल निर्मितीवर भर देतोय. परंतु ऊस उत्पादन घटले, पर्यायाने साखरेचे उत्पादन घटून देशांतर्गत तसेच जागतिक बाजारात मागणी वाढू लागली की कारखाने साखर निर्मितीलाच प्राधान्य देतील, यात शंकाच नाही.
इथेनॉल निर्मितीचा दुसरा स्रोत अन्नधान्य असून नव्या जैवइंधन धोरणात तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी आदी धान्यांपासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु धान्याचा मानवाला खाण्यासाठी, खराब धान्याचा पशु-पक्षांच्या खाद्यात याचा वापर होतो. कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्वच देश अन्नसुरक्षेला प्राधान्य देत आहेत. त्यातच जगातील बहुतांश देशांमध्ये महापूर नाहीतर महाभयंकर दुष्काळ यामुळे अन्नधान्य उत्पादन घटत आहे. त्यामुळे भारतासह इतरही अनेक देश अन्नधान्य निर्यातीवर मर्यादा घालत आहेत. सध्या इथेनॉल प्रकल्पांना भारतीय अन्न महामंडळाकडून तांदळाचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे तांदळावर आधारीत इथेनॉल प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. मक्याची उपलब्धताही कमीच आहे. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती जी मुळातच कमी होती ती आता अजून मंदावत आहे. अशावेळी इथेनॉल उत्पादन वाढवून पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पीक अवशेषांसह शेतीतील टाकाऊ पदार्थ तसेच इतरही इथेनॉलचे स्रोत शोधून त्यापासून इथेनाल उत्पादन घ्यावे लागणार आहे.
पिकांचे अवशेष जे देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांची विल्हेवाट ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. बहुतांश शेतकरी हे अवशेष शेतकरी सर्रासपणे जाळून टाकतात, त्यापासून इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे. उसाचे पाचट, गव्हाचे काड-भुस्सा, कापसाच्या पऱ्हाट्या, भाताचे तूस, तसेच इतर पिकांचे वाया जाणारे अवशेष (ज्यामध्ये सेल्युलोज-लिग्नाइट-साखर आहे) अशा पर्यायी-पूरक स्रोतांचा वापर करून जैवइंधन तयार केले तर त्याचे उत्तम व्यवस्थापन तर होईल शिवाय शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळतील. तिसऱ्या प्रकारचे जैवइंधन म्हणजे निसर्गात असणाऱ्या अनेक प्रकारच्या शेवाळांमध्ये असलेल्या स्निग्ध तसेच इतर पदार्थांचा वापर करून तयार होणारे इंधन. अन्नसुरक्षा असो की इंधन सुरक्षा केंद्र सरकार आपला भर आत्मनिर्भरतेवर असल्याचे सांगते. अशावेळी इथेनॉल निर्मितीकरिता ऊस तसेच धान्यांऐवजी देशातील सर्व स्रोत पूर्ण क्षमतेने वापरायला हवेत. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये इंधनावरचे परावलंबित्व आपल्याला फार काळ परवडणार नाही. सध्या आपण ८० ते ८५ टक्के इंधन आयात करतो. त्यावर फार मोठे परकीय चलन खर्च होते. अशावेळी पर्यावरणपूरक इथेनॉल तसेच बायोडिझेल यांची निर्मिती ही आपल्या देशातील स्रोतांचा वापर करून करायला पाहिजेत. इथेनॉल खरेदी, वाहतूक, वापर यातही अनेक अडचणी, समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी देखील पावले उचलायला हवीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.