नवी दिल्ली : उद्योजकांवरील छाप्यांवरून टीका झेलणाऱ्या सरकारने स्पष्ट केले आहे, की या छाप्यांचा आणि देशातील गुंतवणुकीचा संबंध नाही. चोरी आणि शिरजोरी चालणार नाही. राजकीय नेते किंवा उद्योगपती असो, चूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल, असा इशारा वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज दिला.
वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)यांनी उद्योजकांवरील छाप्यांमुळे सरकारवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. उद्योजकांवर पडणाऱ्या छाप्यामुळे भारतात गुंतवणूक होत नसल्याचा आक्षेप आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले. हे छापे आणि गुंतवणुकीचा संबंध जोडणे अनाकलनीय आहे. कोणी चोरी करून शिरजोरी करू शकत नाही. कुणाला वाटत असेल की राजकीय नेते(Political leaders) किंवा मोठे उद्योजक आहेत म्हणून कारवाई होणार नाही आणि देशात तसा कायदाही नाही. राजकीय नेते असाल किंवा मोठे उद्योगपती असेल तर कारवाई होणार नाही. ज्याने चुक केली तो शिक्षा भोगेलच. जनतेला नरेंद्र मोदींमध्ये (Narendra Modi)पहिल्यांदा असा पंतप्रधान दिसतो आहे जो मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करायला तयार आहे, असे गोयल म्हणाले.
देशातील श्रीमंतांचे एक पाऊल देशाबाहेर असून ते अनिवासी भारतीय बनण्याच्या प्रयत्नात आहेत, हा आक्षेप नाकारताना मंत्री गोयल म्हणाले, की ज्याप्रकारे भारतात गुंतवणूक होत आहे ते पाहता संपूर्ण जग भारतात येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहे. गैरव्यवहार करून बाहेर पळणाऱ्या पळपुट्यांना परत आणण्यासाठी कायदा केला आहे. गेल्या सात वर्षात दरवर्षी विक्रम तोडून थेट परकीय गुंतवणूक भारतात येत आहे. आज भारतात ६३० अब्ज डॉलरपेक्षा अधिक शिल्लक आहे. गुंतवणूकदारांना देशातील १३५ कोटी लोकांच्या आर्थिक शक्तीचा अंदाज आहे. ४०० अब्ज डॉलर (३० लाख कोटी रुपये) विक्रमी निर्यातीबद्दल बोलताना गोयल यांनी ही केवळ सुरवात असल्याचे म्हणत ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...’ अशी टिप्पणी केली. ते म्हणाले, की हे केवळ व्यापारी वस्तू निर्यातीचे आकडे आहेत. सेवाक्षेत्राच्या निर्यातीचे आकडे यायचे बाकी आहेत. यातील ५० अब्ज डॉलर (३.७५ लाख कोटी रुपये) ऐतिहासिक निर्यात अन्नदाता शेतकऱ्यांनी केली आहे.
गव्हाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची सूचना
उद्योग, लघ,मध्यम उद्योग, स्टार्टअप, निर्यातदारांनी केलेल्या या कामगिरीचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रशंसा करायला हवी, असे आवाहनही केले. युक्रेन - रशिया युद्धाच्या परिस्थितीमुळे भारताला गहू निर्यातीची संधी असल्याचे गोयल यांनी सांगितले. या निर्यातीमध्ये
गव्हाच्या गुणवत्तेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे. जेणेकरून भारतातील शेतकऱ्यांना गहू निर्यातीसाठी स्थायी बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही गोयल म्हणाले.