
Nashik News : कमी पर्जन्यमानामुळे निफाड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, अतिरिक्त भारनियमन व वीज कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवारी (ता. ४) माजी आमदार अनिल कदम यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचा निषेध करत तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
बाजार समितीपासून मोर्चास प्रारंभ झाला. ‘बंद करा बंद करा, वीज भारनियमन बंद करा’, शेतकरीविरोधी व लाठीमार करणाऱ्या भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा देण्यात आल्या. धडक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. तहसीलदार शरद घोरपडे, वीज कंपनीचे नाशिक कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, चांदवड कार्यकारी
अभियंता काळू माळी, ओझरचे सहायक अभियंता संदीप शिंदे, निफाडचे नीलेश नागरे, लासलगावचे प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर कराड, शिवा पाटील-सुरासे, भाऊलाल कुटे, रतन पाटील वडघुले, प्रभाकर मापारी, बंडू अडसरे, राम बोडके, आशिष मोगल, सुरेश खैरनार शरद कुटे यांनी विजेसंदर्भात व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.
तहसीलदार घोरपडे व कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण महाराष्ट्रात कमी पावसामुळे विजेची मागणी वाढल्याने अतिरिक्त भारनियमन होत असल्याचे सांगून उपाययोजना सुरू असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. जालना येथे मराठा आरक्षणासाठीच्या उपोषण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधाबाबतही अनिल कदम यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.