
Raju Shetti : केंद्र सरकारकडून एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांना टनापाठीमागे फक्त १०० रुपये वाढणार आहेत. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.
केंद्राने जाहीर केलेली मदत मोठी असल्याचा डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने आज जी दहा रुपयाची वाढ केली, ती वाढ करत असताना कोणत्या आधारे केली. असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले की, उत्पादन खर्च कोणता धरला. केंद्र सरकारने आजची केलेली वाढ ही डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही २२ टक्क्याहून अधिक वाढलेली आहे. यामुळे झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झालेली आहे यामुळे हा दर परवडणारा नसल्याचे शेट्टी म्हणाले.
कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी एक टन उसाचा खर्च १५७० रुपये दाखवलेला आहे. त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत हा डांगोरा पीटत आहेत.
कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतक्या खर्चात काढला हे दाखवून द्यावे. सरकारने साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवलेली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास ५२% ची वाढ झालेली आहे. यामध्ये रासायनिक खते, मजुरी, मशागत, तोडणी वाहतूक, खते, कीटकनाशके यांचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला ३५० रुपयाची वाढ मिळालेली असल्याची संतप्त प्रतिक्रीया राजू शेट्टी यांनी मांडली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.