वर्धा : बाजार समितीमध्ये सहायक निबंधक हे पदसिद्ध सदस्य असतात. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहून शासनाच्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र सहायक निबंधक बाजार समितीमधील कोणत्याही बैठकीला हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सहायक निबंधकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.
हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी भवन येथे आयोजित सहायक निबंधक व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. या वेळी विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू उपस्थित होते.
या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की शेतीमाल तारण योजना राबविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रोत्साहित करण्यात यावे. शेतीमालाचे भाव बाजारात पडलेले असताना शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये म्हणून शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण योजनेत ठेऊ शकतात.
शेतीमालाच्या तत्कालीन बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यथावकाश वाढलेल्या बाजारभावाचा लाभही नंतर शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करावे. तूर खरेदी मध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी तूर विकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ त्रुटी दूर करण्यासाठी सांगावे. तसेच काही कारणाने ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
अवसायनात निघालेल्या सहकारी संस्था तत्काळ बंद करण्यासाठी कारवाई सुरू करावी. विदर्भातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी अटल पणन योजना राबविण्यात येणार असून, यामध्ये जुन्या भात गिरण्यांचा समावेश करण्यात येईल. तसेच प्रत्येक गावात एक सोसायटी निर्माण करावी. प्रत्येक शेतकरी अशा सोसायटीचा सभासद असला पाहिजे. सहकार क्षेत्रातील अनुभव संस्था उभी करण्यासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.