
अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत ५२ लाख रुपयांचे बियाणे सदोष आढळले होते. या बियाण्यांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टळावी, याकरिता जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्र, कंपन्यांचे निविष्ठा साठवणुकीचे ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२४ बियाण्यांचे, ९५ खतांचे व २६ कीटकनाशकांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये सदोष आढळलेल्या ५.४८ लाखांच्या ६३.५ मेट्रिक टन रासायनिक खताला व ५७ हजार रुपयांच्या कीटकनाशकाच्या साठ्याला विक्रीबंद आदेश बजावण्यात आले आहेत. वरुड येथे बनावट रासायनिक खताच्या १०८ बॅग जप्त करून पोलिस तक्रार नोंदविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ही माहिती दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हंगामापूर्वीच बनावट निविष्ठांविरोधात कारवाई करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा स्तरावरील एक व तालुका स्तरावरील १४ याप्रमाणे १५ भरारी पथकांचा वॉच आहे. बनावट बियाण्यांपासून सावध राहा एचटी, बीटीची अवैध विक्री काही ठिकाणी होत आहे. अशा बियाण्यांचे बिल दिले जात नाही. त्यामुळे हे बियाणे उगवले नाही किंवा अन्य समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आणि शिफारशीत बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.