औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत बहुतांश भागात गुरुवारपासून (ता. १५) आकाशात ढगांची गर्दी तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाची भुरभुर पडत असल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारीच्या मध्यान्हानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्यतेने पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होते आहे. शिवाय जे पीक काढू शकत नाही ते अवकाळी पावसामुळे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे.
फेब्रुवारीच्या मध्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने तीन ते चार दिवस मराठवाड्याला झोडपून काढले होते. औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने जवळपास १ लाख ४७ हजार हेक्टरवरील कोरडाहू, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावरून सुरू आहे. त्यात आता पुन्हा एकदा दोन दिवसांपासून आकाशात जमणाऱ्या ढगांनी शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
शुक्रवारी (ता. १६) औरंगाबाद जिल्ह्यातील ढोरकीन, चित्तेपिंपळगाव, करमाड, भेंडाळा, गणेशवाडी आदी ठिकाणांसह आडूळ परिसरातील काही ठिकाणी तसेच लोहगाव आदी ठिकाणी कुठे हलका पाऊस तर कुठे काही क्षण पावसाची रिमझीम झाली. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, गणेशवाडी शिवारात पावसाच्या भुरभुरीमुळे काढणीला आलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
जालना जिल्ह्यातही बहुतांश भागात शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी पहायला मिळाली. कुंभार पिंपळगाव शिवारात ढगाळ वातावरणाबरोबरच अधूनमधून पावसाचे थेंब टपकत होते. सकाळपासून सूर्यदर्शनच न झाल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिके झाकण्यासाठी, काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.