डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचणे आवश्यक ः डाॅ. ढवण

डाळिंबावर प्रकिया करून मूल्यवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. ए. एस. ढवण यांनी व्यक्त केले.
Technology needs to reach farmers
Technology needs to reach farmers

औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा मिळवण्यासाठी डाळिंबावर प्रकिया करून मूल्यवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. ए. एस. ढवण यांनी व्यक्त केले. 

कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड, औरंगाबाद व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय ऑनलाइन डाळिंब पीक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटन (ता. २१) कार्यक्रमात डॉ. ढवण बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, आयसीएआर-एनआरसीपी, सोलापूरच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा, वनामकृवि परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे आदींची उपस्थिती होती. 

डाॅ. ढवण म्हणाले, की डाळिंब हे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे फळपीक आहे. डाळिंबाच्या अधिक आणि गुणवत्ता पूर्ण उत्पन्नासाठी उच्च दर्जाचे रोपे पुरवणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या विविध संस्थामार्फत रोपवाटिका उभारणी करणे आणि त्याद्वारे चांगल्या गुणवत्तेचे रोपे शेतकऱ्यांना दिल्यास त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होण्यास मदत होईल. 

डॉ. लाखन सिंग म्हणाले, की अटारी, पुणे यांच्याद्वारे राज्यातील केव्हीकेंच्या शास्त्रज्ञांकरिता डाळिंबावरील प्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्याचा उपयोग हे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास करण्यात येणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर व कृषी विद्यापीठांनी मिळून सर्व शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या सुधारित व शास्त्रीय तंत्रज्ञानाची कार्यप्रणाली तयार करावी. ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ‘एनआरसीपी’च्या डॉ. शर्मा यांनी एनआरसीपीद्वारे विकसित विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच डाळिंबातील एकात्मिक रोग व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

डॉ. देवसरकर म्हणाले, की मराठवाड्यात डाळिंब हे महत्त्वाचे पीक आहे. सर्व डाळिंब उत्पादकांनी विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांद्वारे शिफारशीत सुधारित तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केल्यास त्यांच्या उत्पन्नात आमूलाग्र बदल होऊ शकतो. डॉ. मोटे यांनी फळबाग वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध बाबींची माहिती दिली. 

या कार्यक्रमात दि. २२ रोजी एनआरसीपीचे शास्त्रज्ञ डॉ. सिंग यांनी डाळिंब पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी शास्त्रीय पद्धती या विषयावर तसेच डॉ. आशिष मैती यांनी डाळिंब पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तर डॉ. मल्लिकार्जुन यांनी विविध पीक हंगामातील डाळिंबावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमात महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २३ एप्रिल रोजी विविध हंगामांतील डाळिंब पिकाचे पाणी व्यवस्थापन या विषयावर डॉ. पी. शिरगुरे यांचे तर डाळिंबातील प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर डॉ. नीलेश गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी https://us05web.zoom.us/j/83716775601?pwd=VXNyRGR1RHlZSmhiSjI0dTlFWjRQZz09 या लिंकचा तसेच मिटिंग आयडी 83716775601 व पासवर्ड 12345 वापर करून झूम अपद्वारे शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. 

या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी केले. विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेतील श्रीमती अमरीन सय्यद व इतर सर्वच कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. तसेच या वेळी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण शास्त्राज्ञाद्वारे करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com