
नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत अशा मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी फडणवीस सरकारने सुरु केलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेला मागील दोन वर्षांपासून घरघर लागली आहे. नवीन फळबाग लागवडीसाठी लक्षांक तर नाहीच परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या फळबागेचे ७५ लाख ६५ हजार रुपये थकले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी तत्कालीन राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २० जून २०१८ रोजी सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा होता. फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार असे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मध्ये या योजनेतून १३४ हेक्टर व २०२०-२१ मध्ये ४८ हेक्टर अशा १८२ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली. परंतु या योजनेतंर्गत लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान मात्र रखडले आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्ग सहा हेक्टर, अनुसूचित जमाती १४.६० हेक्टर, महिला २२ तर इतर १३९.९६ हेक्टर अशा ३५७ शेतकऱ्यांचे ७५ लाख ६५ हजार रुपये थकले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
दरम्यान, मागील दोन वर्षापासून या योजनेतंर्गत फळबाग लागवडीचे लक्षांक आले नाही. यामुळे जलयुक्त शिवार प्रमाणेच ही फळबाग योजनाही आघाडी सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. २०१८ला सुरू झाली योजना... शासन निर्णयानुसार राज्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली. योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी फळबाग लागवड करण्यात येत होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.