
अकोला ः ‘‘रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या हरभरा या पिकातून हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते. हरभरा पिकाला युरियाद्वारे नत्राची दुसरी मात्रा देण्याचे टाळावे’’, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी दिला.
रिलायन्स फाउंडेशन व कृषी विद्यापीठातर्फे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ. खडसे यांच्यासह विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा कदम सहभागी झाल्या. डॉ. खडसे म्हणाले, ‘‘पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते. हरभरा लागवड करताना पेरणी वेळेवर करण्याची आवश्यकता आहे.
अन्यथा, उत्पादनात विलक्षण घट येते. बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक त्यानंतर जैविक रायझोबियम, ट्रायकोडर्मा संवर्धके चोळावेत. पिकाला खत देताना पेरणीच्या वेळेसच नत्र, स्फुरद व पालाशाची संपूर्ण मात्रा द्यावी. वाढीसाठी नत्राची दुसरी मात्रा देऊ नये. त्यामुळे घाटे धारणा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’
‘‘जास्त पाणी दिले, तर पीक उधळण्याचा धोका वाढतो. स्थानिक परिस्थितीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंटिमीटर पाणी लागते. जिरायत हरभरा क्षेत्रात एखादे पाणी देणे शक्य असेल, तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. भारी जमिनीत पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी ३० ते ३५ दिवसांनी पहिले व ६० ते ६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे,’’ असे डॉ. खडसे म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.