
पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांना या कार्यालयात प्रवेश देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रसार टळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत तातडीचे टपाल संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. तालुक्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी देखील कामानिमित्त मुख्यालयात येतात. त्यांना देखील ई-मेल सुविधा वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तर जिल्हा परिषद मुख्यालयातील दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रवेशद्वाराजवळ टपाल कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या कक्षामध्ये टपाल पुढील आदेश येईपर्यंत सर्व टपाल स्वीकारले जाणार आहेत. तालुका पातळीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयाच्या व अन्य विभागात प्रवेश करता येणार नाही.
ग्रामीण भागातून येणाऱ्या अभ्यागतांच्या तक्रारी, निवेदने आणि अर्ज स्विकारण्यासाठी देखील मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील टपाल कक्षात सुविधा करण्यात आली आहे. त्याठिकाणी दिलेली सर्व निवेदने, टपाल सामान्य प्रशासन विभागाने सांयकाळी सहा नंतर घेऊन विभागाकडे देण्याच्या सूचना केल्या आहेत.
प्रशासकीय अथवा जिल्हा परिषदेशी संबंधित कोणत्याही कामासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४१३० निश्चित केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यावर संपर्क साधता येऊ शकतो. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घेण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.