
जळगाव : खानदेशात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी जोखीम घेत कडधान्य पिकांची पेरणी केली. परंतु, त्यावर चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचेही गेले दोन दिवस तज्ज्ञ, विविध संस्था सांगत आहेत. यामुळे पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु पाऊस गेले तीन दिवस हुलकावणी देत आहे. सकाळी पावसाळी वातावरण असते, दुपारी ऊन पडते आणि सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण, काही भागात विजांचा चमचमाट, अशी स्थिती असते. महागडे बियाणे शेतकऱ्यांनी पेरलेले नाही.
सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या पिकांना किमान ३० ते ३५ मिलिमीटर पावसाची गरज असते. पेरणीनंतरही पाऊस हवा असतो. सोयाबीन, कापूस, ज्वारीचे बियाणे महाग आहे. यामुळे त्याची पेरणी शेतकऱ्यांनी टाळली आहे.
कडधान्यवर्गीय पिकांत तूर, उडीद व मुगाची पेरणी शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात केली. ही पेरणी धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, शहादा, जळगावमधील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, चोपडा आदी भागात झाली आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीकाठी पेरणी शेतकऱ्यांनी केली. अनेकांनी घरात साठविलेले उडीद, मूग व तुरीचे बियाणे पेरले आहे. पण पाऊस हवा तसा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पेरणीची टक्केवारी अत्यल्प
पाऊस पडत आहे, पण फक्त काही भागातच त्याचे आगमन होत आहे. सर्वत्र पाऊस नाही. जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड भागात पाऊस आलेलाच नाही. फक्त यावल, जळगाव, रावेर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल आदी भागात गेल्या आठवड्यात पाऊस झाला. पेरणीची टक्केवारी अत्यल्प आहे. त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. पण पेरणीसाठी पूर्वमशागती झाल्या आहेत. शेतकरी मोसमी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.