जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस मात्र कुठेही झालेला नाही.
बुधवारी (ता. १६) सायंकाळी ढगांची जमवाजमव झाली आणि हलका पाऊस सुरू झाला. यानंतर रात्रीदेखील अधूनमधून सरी कोसळत होत्या. यामुळे वातावरणात गारवा तयार झाला, पण कुठेही पाऊस वाहून निघाला नाही. यामुळे अतिवृष्टी झाल्याची माहितीदेखील नाही. पेरण्यांसाठी किमान ४० ते ६० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे.
पेरणीयोग्य पाऊस खानदेशात कुठेही झालेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, अमळनेर, भुसावळ, जामनेर, यावल आदी भागांत पाऊस झाला. धुळ्यात शिंदखेडा, धुळे, शिरपूर येथे पाऊस झाला. तर नंदुरबारातही तळोदा, शहादा, अक्कलकुवा आदी भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली. गुरुवारी (ता. १७) सकाळपासून पावसाळी वातावरण होते. उकाडा, ढगांची जमवाजमव, अशी स्थिती होती. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण खानदेशात पावसाची अनेक दिवस प्रतीक्षा होती. जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.
कापूस व इतर कोरडवाहू पिकांची पेरणी लांबत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोपूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीची पेरणी वेळेत किंवा २० जूनपूर्वी व्हायला हवी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. पण पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेले नाहीत, असे चित्र आहे. बुधवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव २१, चोपडा १४, धरणगाव ११, एरंडोल १३. धुळे १७, शिंदखेडा ११, नंदुरबार १४.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.