
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील जवळपास ७० मंडळांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गहू, मका, ज्वारी, हरभऱ्यासह आंबा, द्राक्ष आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी अचानक सर्वत्र ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटांसह वादळी वारे वाहून या जिल्ह्यांत पाऊस पडला. बीड जिल्हा : बीड तालुक्यातील म्हसाजवळा, नळवंडी, चौसाळा नेकनूर, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, गेवराई तालुक्यातील रेवकी, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, किट्टीताडगाव, दिंद्रूड, केज तालुक्यातील हनुमंत, परळी तालुक्यातील नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव, वडवणी तालुक्यातील वडवणी आदी १४ मंडळांत अवकाळी पाउस झाला. गेवराई तालुक्यातील खामगाव येथे गारपीट झाली. गंगावाडी धोंडराई येथील अंकुश नवले यांचे बैल व गाय अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडले. परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील गोपीनाथ कुंभार या शेतकऱ्याच्या शेवगा पिकाचे मोठे नुकसान झाले. इतरत्र गहू, हरभऱ्यासह फळपिकांचे नुकसान झाले. जालना जिल्हा : जालना जिल्ह्यातील २७ मंडळांत अवकाळी पाऊस, गारपिटीसह वादळाने हजेरी लागली. परतूर तालुक्यातील परतूर मंडळात सर्वाधिक १४.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडीगोद्री व शहागड परिसरात सायंकाळी गारांचा सडा पडला. त्यामुळे शेतकरी व मजुरांची चांगलीच धांदल उडाली. जाफराबाद तालुक्यात नळविहिरा, आंबेगाव टेंभुर्णी परिसरात तसेच जालना तालुक्यातील कडवंची शिवारात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले. आंब्याला आलेला मोहोर व कडवंची शिवारातील द्राक्षासह डाळिंब पिकांचेही नुकसान झाले. औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव, पैठण तालुक्यातील अडूळ, डोणगाव, वैजापूर तालुक्यातील बोरसर, कन्नड तालुक्यातील चापानेर, देवगाव, चिकलठाणा, चिंचोली, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, सुलतानपूर, बाजार, सिल्लोड तालुक्यांतील सिल्लोड, निल्लोड, भराडी, अजिंठा, बोरगाव अंभई, सोयगाव तालुक्यातील सावलदबारा, बनोटी, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री, आळंद, पीरबावडा आदी जवळपास २२ मंडळांत वादळी वाऱ्यासह हजेरी लागली.
उस्मानाबाद व लातूर जिल्हा उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अनुक्रमे तीन व चार मंडळांत अवकाळी पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी, इटकळ व पारगाव मंडळात अवकाळी पावसाची हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यांतर्गत येत असलेल्या औराद, अंबूलगा, मदनसुरी, भातमुंगळी या चार मंडळांत अवकाळी पाऊस झाला. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं, फळपिकांचं नुकसान करण्याचं काम अवकाळी पावसासह गारपिटीनं केलं आहे. शासनानं तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. - संजय मोरे पाटील, शेतकरी, नळविहिरा, ता. जाफराबाद, जि. जालना
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.