
पुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या पहिल्या वर्षाचा टप्पा महाराष्ट्राने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. राज्यातील ५८.३९ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई-पीक पाहणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी सोयाबीनची झाली असून क्षेत्र नोंदणीत सर्व जिल्ह्यांमध्ये जळगावने आघाडी घेतली आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त नि. कु. सुधांशू यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे आव्हान पेलून दाखविले आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी राज्यस्तरीय समन्वयाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गेल्या खरिपात केलेल्या कामकाजाचा संख्यात्मक अहवाल तयार झालेला आहे. त्यानुसार या पाहणीत ५८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यासाठी ३४ लाखांहून जास्त भ्रमणध्वनींचा (स्मार्टफोन) वापर शेतकऱ्यांनी केला आहे. सर्वात जास्त स्मार्टफोनचा वापर औरंगाबाद विभागात (८.७३ लाख) तर सर्वात कमी वापर कोकण विभागात (१.१६ लाख) केला गेला आहे. विभागनिहाय कामकाज बघता नागपूर विभागाने ई-पीक पाहणीत बाजी मारली आहे. तेथे ९.८६ लाख शेतकऱ्यांनी पाहणी करून १३.५४ लाख हेक्टरवरील २९९ पिकांची नोंदणी केली. या विभागात एकूण १९.२७ लाख हेक्टरवर पिके होती. म्हणजेच या विभागाने ७०.२६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंद ई-पीक पाहणी प्रकल्पाद्वारे पूर्ण केली आहे.
प्रतिक्रिया
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या माध्यमातून ‘माझा शेतकरी माझा सातबारा- मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ अशी संकल्पना शेतकऱ्यांसमोर मांडली होती. तिचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. हा केवळ पीक नोंदणीचा नसून, शेतकऱ्यांना सरकारी कामकाजात सामावून घेणारा आणि अधिकाराचे स्वातंत्र्य देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे. त्याचे श्रेय सरकारी कर्मचारी, शेतकरी आणि धोरणकर्त्या लोकप्रतिनिधींना जाते. -रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प, जमाबंदी आयुक्तालय
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वी अशी ठरली पहिल्या ई-पीक पाहणीचे वैशिष्ट्ये ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणारे खातेदारः ५८,३९,८०४ नोंदणी करूनही पीक पाहणी न करणारे खातेदारः २३,६३,९८८ खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्रः १४९ लाख ७३ हजार हेक्टर त्यापैकी ई-पीक पाहणी झालेले क्षेत्रः ६२,८२,४९४ हेक्टर ई-पीक पाहणीत सर्वाधिक क्षेत्र नोंदविणारे जिल्हेः प्रथम जळगाव (४.८९ लाख हेक्टर), द्वितीय अमरावती (४.२६ लाख हेक्टर), तृतीय यवतमाळ (३.९४ लाख हेक्टर) ई-पीक पाहणीत शंभर टक्के नोंदणी केलेले जिल्हे ः गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर सर्वाधिक पिके नोंदविणारे जिल्हेः प्रथम नाशिक (पीक संख्या ३८४), द्वितीय नगर (३७२) आणि तृतीय पुणे (३७०) सर्वाधिक नोंदणी झालेली पिकेः प्रथम सोयाबीन (२४.३४ लाख हेक्टर), द्वितीय कापूस (१५.९४ लाख हेक्टर), तृतीय भात (९.३९ लाख हेक्टर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.