
अकोला ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील मुख्य घटक असणारे पणज महसूल मंडळातील बंदस्थितील स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने उभे झाले आहे. स्वयंचलित हवामान केंद्र बंद व अयोग्य असल्यामुळे हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत पणज महसूल मंडळमधील केळी व संत्रा या फळपिकांसह इतर विमाधारकांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी तयार झाल्या होत्या. ही बाब रुईखेड येथील प्रगतशील शेतकरी धनंजय मानकर व इतरांनी २ डिसेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांच्या निदर्शनात आणून दिली होती. पणज मंडळामधील फळपीक विमाधारक शेकडो शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे, हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यावर कृषी अधीक्षक श्री. वाघ यांनी २० डिसेंबरला स्कायमेट वेदर लिमिटेड व तालुका कृषी अधिकारी यांना आदेश देऊन हवामान केंद्रांची योग्यरीत्या तपासणी व पंचनामा करून सदर हवामान केंद्र योग्य ठिकाणी बसविण्याचे आदेश दिले होते. त्यावर रुईखेडचे सरपंच पंकज मानकर यांनी ग्रामसभेमध्ये रुईखेड येथे स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव घेत जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर हे केंद्र स्थापन करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.