मराठवाड्यातील जमिनीत नत्राची कमतरता, पालाश भरपूर

मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांतील लागवडीखालील जमिनीत नत्राची कमतरता आहे. सर्व जिल्ह्यांत स्फुरदाचे प्रमाण मध्यम तर पालाश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
soil health
soil health
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांतील लागवडीखालील जमिनीत नत्राची कमतरता आहे. सर्व जिल्ह्यांत स्फुरदाचे प्रमाण मध्यम तर पालाश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. जस्त, लोह, बोरॉन, सल्फर आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांची सर्वदूर कमतरता आहे. सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपायासोबतच प्रत्येक गावातील जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार कोणत्या पिकाला कोणती खते, किती प्रमाणात द्यावयाची हे समजून घेणे आवश्‍यक आहे.  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील जमिनीत नत्राचे प्रमाण कमी, तर स्फुरदाचे प्रमाण मध्यम आणि पालाशचे प्रमाण भरपूर आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जमिनीत नत्राचे प्रमाण मध्यम तर स्फुरदाचे प्रमाण कमी आणि पालाशचे प्रमाण मध्यम आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पालाशचे प्रमाण भरपूर आहे. जस्त, लोह, बोरॉन, सल्फर या चार सूक्ष्म अन्नद्रव्यांची आठही जिल्ह्यांत कमतरता असल्याचे मराठवाड्यातील जमीन आरोग्य पत्रिकांमधील मृद्‍ सर्वेक्षण व मृद्‍ चाचणी नोंदीच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.  राज्याच्या कृषी आयुक्‍तांनी जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या सायकलच्या आधारावर अन्नद्रव्यांचे तयार करण्यात आलेले तालुका व गावनिहाय सुपकीता निर्देशांक कळविळ्याची सूचना प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाच्या खत मात्रेविषयी जागराचे काम हाती घेतल्याची माहिती जिल्हा मृद्‍ सर्वेक्षण व मृद्‍ चाचणी अधिकारी संजय कायंदे यांनी दिली. याबाबत ते म्हणाले, की प्रामुख्याने कापूस, मका, सोयाबीन, गहू, हरभरा आदी पिकांना पेरणीच्या वेळी, पेरणीनंतर सुपीकता निर्देशांकानुसार हेक्‍टरी व एकरी रासायनिक खतांची मात्रा किती द्यायची, हे शेतकऱ्यांना चार्टच्या माध्यमातून समजावून सांगितले जाणार आहे. सेंद्रिय कर्ब कमीच औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.४० टक्‍काच आहे. हे प्रमाण १ टक्‍का असणे आवश्‍यक आहे. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उसाचे पाचट तसेच कपाशीचे अवशेष जाळून न टाकता श्रेडर यंत्राने बारीक करून जमिनीत कुजविण्याविषयी शेतकऱ्यांचे प्रबोधन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे. इतर जिल्ह्यातही सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणाची स्थिती समाधानकारक नाही.

प्रतिक्रिया कमतरता पाहता खत देताना नत्राचे प्रमाण ३३ टक्‍के वाढवून द्यावे लागेल. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार स्फुरद द्यावे लागेल. पालाशचे प्रमाण भरपूर असल्याने विद्यापीठाच्या शिफारशीपेक्षा ३३ टक्‍के कमी प्रमाणात वापरावे. पिकांना सर्व आवश्‍यक सर्व घटक उपलब्ध होण्यासाठी सेंद्रिय कर्ब किमान १ टक्‍का असावा. औरंगाबाद जिल्ह्यात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.४० टका‍के असल्याने तो वाढविण्यासाठी भर द्यावा लागणार आहे.  - संजय कायंदे , जिल्हा मृद्‍ सर्वेक्षण व मृद्‍ चाचणी अधिकारी, औरंगाबाद

जिल्हानिहाय नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण (टक्के)

जिल्हा   नत्र स्फुरद पालाश
औरंगाबाद ०.९१  १.४ २.२८
जालना ०.९५  १.३९    २.३४
बीड   ०.८५ १.८८   २.४६
लातूर १.२२ १.३२  २.४६
उस्मानाबाद  १.४४   १.२१   १.७७
परभणी १.०२  १.३७  २.३७
हिंगोली १.१८ १.३३    २.३६

जिल्हानिहाय जस्त, लोह, बोरॉन, सल्फरचे प्रमाण (टक्के)

जिल्हा   जस्त लोह  बोरॉन   सल्फर 
औरंगाबाद  ७२.१४     ८३.२८    ५८.८३ ६.१९
जालना ५०.००  ९०.९४  ६२.८१  ८९.७०
बीड ४३.४१   ७९.५८   २४.६९   ४४.४६
लातूर  ५८.८६   ६७.९५  ६३.२६  ९१.०९
उस्मानाबाद    ७३.९५   ७१.२५ ५०.१८  ८७.८३
परभणी  ४७.२२   ४६.९४   ५४.९०  ८२.६५
हिंगोली  ४०.८३   ३१.२२  ४५.९८ ८३.७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com