पावसाने ओढ दिल्याने विदर्भात पिके संकटात

पावसाने उघडीप दिल्याने लागवड झालेल्या क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. गुरुवार (ता. १५) पर्यंत अशीच स्थिती राहिल्यास राज्यात आपत्कालीन पीक आराखडा जाहीर करण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Crops in Vidarbha in crisis due to rains
Crops in Vidarbha in crisis due to rains
Published on
Updated on

नागपूर : पावसाने उघडीप दिल्याने लागवड झालेल्या क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. गुरुवार (ता. १५) पर्यंत अशीच स्थिती राहिल्यास राज्यात आपत्कालीन पीक आराखडा जाहीर करण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यात या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याची शक्‍यता हवामान खात्याने हंगामाच्या सुरुवातीला वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र १ जूनपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या २८ जून रोजीच्या पेरणी अहवालानुसार राज्यात आजवर सुमारे ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये कापसाखालील सर्वाधिक ४७ टक्के क्षेत्राचा समावेश आहे. 

राज्यात तृणधान्य १३ टक्के, तर कडधान्य ३८ आणि अन्नधान्य २२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. गळीतधान्य ५३ आणि अन्नधान्य २२ टक्के याप्रमाणे लागवड क्षेत्र आहे. हवामान खात्याने चांगले पाऊसमान वर्तविली असतांनाच विदर्भात पावसाने मोठा खंड दिला आहे. त्यामुळे लागवड केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विदर्भात अकोला वगळता इतर जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली असली तरी या पावसाचे वितरण योग्य झाले नसल्याने त्याचा पिकाला कोणताही फायदा झाला नसल्याची माहिती अकोला कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ११५.९ मिलिमीटर, नागपूर ९५.५, भंडारा ११४.६, गोंदिया ८४.१, चंद्रपूर १४५.३, गडचिरोली ८६.१ मिलिमीटर याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचे वितरण योग्य प्रमाणात झाले नाही. पश्‍चिम विदर्भातील अकोला अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मात्र शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात ९५.३ मिलिमीटर पाऊस झाला. या उलट बुलडाणा १८३.५, वाशीम २४१.१, अमरावती २१५.८, यवतमाळ २९२.४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उडीद, मूग, ज्वारी ही पिके आता घेता येणार नाही. मात्र सोयाबीन व त्यात तुरीचे आंतरपीक या पॅटर्ननुसार १५ जुलैपर्यंत लागवड करता येणार आहे. हवामान खात्याने येत्या एक, दोन दिवसांत पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी चिंतेची बाब वाटत नाही. यापुढील काळात मात्र पावसाने ओढ दिल्याने स्थिती भयावह होणार आहे.  - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com