परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा विविध नैसर्गिक आपत्तींमुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट आली. त्यामुळे पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांच्याकडे केली.
यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे लिमला परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याला प्राधान्य दिले. परंतु, पिकांच्या विविध अवस्थेत तापमानातील चढ-उतार तसेच कीड, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फुले, घाटे गळ झाली. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट आली. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाईलव्दारे ऑनलाइन पद्धतीने विमा कंपनीला दिली.
आळसे हे इटलापूर माळी (ता.पूर्णा) येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांना शेतकरी शिवबाबा, शिंदे, विलास राऊत, गोविंदराव शिंदे, शिवकिरण शिंदे, लक्ष्मण शिंदे, रामराव ढगे, दिगंबर शिंदे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानोबा ढगे, तुकाराम शिंदे, राम गलांडे, विलास कुकर आदींनी मागणीचे निवेदन दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.