
सिंधुदुर्गनगरी ः गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमान वाढीमुळे आंबा बागायतदारासमोर फळगळीचे संकट उभे राहिले आहे. काजूचा मोहरदेखील करपला आहे. त्यामुळे ही दोन्ही पिके धोक्यात आली आहेत.
जिल्ह्यात १३ मार्चपूर्वी ३२ ते ३४ सेल्सिअसपर्यंत तापमान होते. १३ मार्चनंतर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला. गेल्या चार, पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली. ३६ पासून अगदी ४१ सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. या तापमानावाढीचे दुष्पपरिणाम आता फळबागांवर दिसू लागले आहेत. आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यासह विविध नैसर्गिक संकटाचा सामना करीत टिकविलेल्या बागांमधील फळगळीमुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंब्याप्रमाणे काजूचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
पहिल्या टप्प्यात आलेला काजू अवकाळी पावसामुळे कुजून गेला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला आता फळधारणा होण्याची प्रकिया सुरू होती. त्यातच तापमानवाढीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मोहर करपण्यास सुरवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी तीन नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी (ता. १९) सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
रत्नागिरीत बागायतदारांमध्ये भीती रत्नागिरी ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी (ता. १९) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही कालावधीपुर्ते कडकडीत ऊन पडले; मात्र दुपारनंतर पुन्हा हलका वारा आणि ढगाळ वातावरण होते. याचा परिणाम शेवटच्या टप्प्यात हापूसच्या उत्पादनावर होऊ शकतो. मोहोर आणि लहान कैऱ्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होईल, अशी भीती बागायतदारांमध्ये आहे. कडकडीत उन्हामुळे हापूसच्या फळाचा आकार वाढून तो लवकर काढणी योग्य झाला. मात्र बारीक फळे पिवळी पडून गळून गेली. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे मच्छीमारांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आंब्याची लहान फळे गळण्याची अधिक शक्यता असते. या कालावधीत प्रतिझाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. बागेतील गवत, पालापाचोळ्याचे झाडांच्या बुंध्यावर आच्छादन करावे. यामुळे काही अंशी फळाचे संरक्षण होण्यास मदत होईल. - डॉ. विजय दामोदर, प्रभारी अधिकारी, आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर, ता. देवगड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.