
हिंगोली ः निर्यातीसाठी आंतराष्ट्रीय मानकानुसार गुणवत्तापूर्ण हळद उत्पादन घेणे गरजचे आहे. मागणी वाढली तर बाजारपेठेतील दर स्थिरावतील. त्या दृष्टीने हळदीचा दैनंदिन वापर वाढवावा लागेल. शेतकऱ्यांमध्ये उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचा प्रसार करावा लागेल.मूल्यवर्धनासाठी हळदीचे ब्रॅंडिंग करावे लागेल, असा सूर तज्ज्ञ, शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील स्पाईसेस बोर्ड ऑफ इंडिया (भारतीय मसाले मंडळ) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे हिंगोली येथे गुरुवारी (ता. २४) हळदीवर प्रादेशिक परिसंवाद आयोजित आला होता.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, स्पाइसेस बोर्डाच्या सहाय्यक संचालक (निर्यात) डॉ. ममता रुपोलिया, सल्लागार (विपणन आणि निर्यात प्रोत्साहन) पी. पी. कनेल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी उपसंचालक एस. व्ही. लाडके, आत्माचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, अनिल ओळंबे, प्रगतिशील शेतकरी गंगाधर शृंगारे, पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे आदी उपस्थित होते.
पापळकर म्हणाले, ‘‘निर्यातीसाठी जागतिक दर्जाच्या हळदीच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान तसेच हळद धोरणाबाबतची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.’’ डॉ. रुपोलिया म्हणाल्या, ‘‘गोल्डन स्पाइस म्हणून ओळख असलेल्या हळद या मसाले वर्गीय पिकाच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा ७० टक्के हिस्सा आहे. उत्पादनात वाढ न केल्यास हा हिस्सा कमी होईल. अन्य देश बाजारपेठ काबीज करतील. निर्यातीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन, योग्य पीक व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीद्वारे गुणवत्तापूर्ण हळदीचे उत्पादन घ्यावे लागेल.
हिंगोली जिल्ह्यातील हळदीला भौगौलिक मानांकन (जीआय) मिळावे यासाठी प्रक्रिया सुरू आहे.’’ कनेल म्हणाले, ‘‘उत्पादनात वाढीसह योग्य पद्धतीने साठवणूक, कुरकुमीनची टक्केवारी आदी बाबी निर्यातीसाठी महत्त्वाच्या आहेत.’’
डॉ. शेळके म्हणाले, ‘‘शुद्ध बेणे उपलब्धता, वेळेवर लागवड, शिफारशीनुसार खत, पाणी व्यवस्थापन, लागवड ते काढणीपर्यत यांत्रिकीकरण, काढणी पश्चात हाताळणी यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.’’ ओळंबे म्हणाले, ‘‘सुधारित वाण, योग्य जमिनिची निवड, बेणे प्रक्रिया, एकात्मिक व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढेल.’’ घोरपडे म्हणाले, ‘‘सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीतून हळदीच्या मूल्यवर्धनास चालना मिळेल.’’
शृंगारे म्हणाले, ‘‘उत्पादन, उत्पन्नाच्या खात्रीमुळे जिल्ह्यातील पारंपारिक पीक असलेल्या हळदीचे क्षेत्र विस्तारत आहे. केवळ क्षेत्र आणि उत्पादन वाढून उपयोग नाही. जगभरातून मागणी वाढली तर बाजारभाव स्थिर राहतील. त्यासाठी हळदीचा दैनंदिन वापर वाढायला हवा. जिल्ह्यातील हळदीचा ब्रॅंड तयार झाला पाहिजे. हळद महोत्सव आयोजित करावा. पीकविमा योजनेत हळदीचा समावेश करावा.’’ शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.