अमरावती विभागात केवळ दोन कारखानेच सुरू

अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यातील ११ पैकी केवळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने खासगी व्यवस्थापनातून चालविले जात आहे.
यवतमाळ : सवना परिसरातील तोडणी झालेला ऊस.
यवतमाळ : सवना परिसरातील तोडणी झालेला ऊस.

अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यातील ११ पैकी केवळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने खासगी व्यवस्थापनातून चालविले जात आहे. गाळपाबाबत काही ऊस उत्पादकांच्या तक्रारी असल्या, तरी प्रशासनाकडून मात्र नोंदणी केलेल्या सर्व ऊस उत्पादकांचा ऊस कारखाने खरेदी करत असल्याचा दावा केला जात आहे.

अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ११  सहकारी साखर कारखाने होते. आजमितीस त्यांपैकी केवळ दोन कारखाने सुरू असून त्यांच्या माध्यमातूनच उसाचे गाळप केले जात आहे. त्यातील गुंज (ता. महागाव) येथील नॅचरल शुगर कारखान्याची गाळप क्षमता २ हजार ५०० टन आहे. आत्तापर्यंत या कारखान्याकडून तीन लाख ८४ हजार ३०३ टन उसाचे गाळप करण्यात आले असून १५ एप्रिल पर्यंत सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कारखान्याकडून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जातो तसे निर्देशही साखर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. 

आर्णी तालुक्यातील मांगुळ येथे असलेल्या डेक्कन शुगर या कारखान्याची गाळप क्षमता देखील दोन हजार पाचशे मेट्रिक टन आहे. या कारखान्याने आत्तापर्यंत दोन लाख २८ हजार २२७ टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात कारखान्याकडून ३ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात  ११ साखर कारखाने होते. त्यांपैकी आता केवळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन कारखान्यांकडून ऊस गाळप होत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून सर्व ऊस कारखाने खरेदी करतात तसे निर्देशही आहेत, सोबतच या भागात तुलनेत ऊस कमी असल्याने शिल्लक ऊस राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. - महेंद्र चव्हाण, उपसंचालक, प्रादेशिक साखर विभाग, अमरावती.

संचालक मंडळाच्या धोरणामुळे सहकारी कारखानदारी संपली. आता खाजगी व्यवस्थापनाकडे गेलेले हे कारखाने मात्र जोमात सुरू आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहतो, याविरोधात आंदोलन केले जाईल. - मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

आमच्या कुटुंबीयांचा दहा एकर क्षेत्रावर ऊस आहे. परंतु कारखान्याच्या नकारात्मक धोरणामुळे हंगामात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुसऱ्या कारखान्याला ऊस दिल्यास नंतर तर छळवादाची मालिकाच सुरू होते. एफआरपीची रक्कम दिली जात नाही. - गुणवंता देशमुख, शेतकरी, सवना, महागाव, यवतमाळ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com