औरंगाबाद : नगर : गणेशवाडी (ता. नेवासे) शिवारात विद्युत वाहिन्यांतून पडलेल्या ठिणगीने १७ शेतकऱ्यांचा तब्बल ४० एकर ऊस जळून खाक झाला. महावितरणने थकबाकीच्या नावाखाली बरीच रोहित्रे बंद केली. त्यामुळे आग शमवताना अडचण आली. अंदाजे १० ते १५ लाखांचे पीक जळाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
गणेशवाडीत सोमवारी (ता.१४) अरुण बाळासाहेब लोहकरे यांच्या उसाच्या पिकाने पेट घेतला. वारा वाहत असल्याने अवघ्या दहा मिनिटांत पूर्व व पश्चिम बाजूच्या शेतांत आग पसरली. महावितरणने बिल वसुलीसाठी काही रोहित्रे बंद केल्याने आग विझविण्यास पाणी उपलब्ध नव्हते. राजेंद्र डौले, आदिनाथ दहिफळे, हरी काकडे, दिलीप लोहकरे, किरण लोहकरेंसह ५० हून अधिक युवकांनी उसाचे वाढे व झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
बाबासाहेब लोहकरे, नामदेव लोहकरे, एकनाथ मिसाळ, अॅड. सुनील गडाख, चांगदेव बेल्हेकर, सुभाष बेल्हेकर यांच्यासह एकूण १७ शेतकऱ्यांचे ४० एकर ऊस जळाला. गणेशवाडीचे सरपंच कैलास दरंदले, पोलिस पाटील संजय दहिफळे व ग्रामस्थांनी भेट दिली.
अंदाजे साडेतीन कोटी रुपयांच्या पिकाला आग लागली होती. ऊस जळाल्याने वजनात दहा ते वीस टक्के घट लक्षात घेता, सतरा शेतकऱ्यांचे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कारभाराबद्दल संतप्त भावना केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.