
Pune News: सीसीआयची कापूस खरेदी १५ मार्चपर्यंत सुरु राहील, असे सीसीआयच्या अध्यक्षांनी सांगितले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे बंद ठप्प झाली आहे. बहुतांशी भागात १२ फेब्रुवारीपासून खरेदी बंद आहे. सीसीआयची कापूस खरेदी केव्हा सुरु होईल, याबाबत निश्चित असे उत्तर सीसीआयकडून मिळत नाही. तर सीसीआयची खरेदी आता बंदच राहणार, अशी चर्चा सध्या बाजारात आहे. यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आले आहेत.
राज्यातील काही खरेदी केंद्रांवरील कापूस खरेदी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच बंद होती. त्यावेळी तांत्रिक अडचणीचे कारण सांगण्यात आले. तसेच कापूस खरेदी पुन्हा सुरु होईल, असे आश्वासन सीसीआयचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी दिले. तसेच राज्यात १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी केली जाईल. शेतकरी कापूस देतील तोपर्यंत खरेदी केंद्रे सुरु राहतील, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कापूस खरेदी पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बाजारात कापूस खरेदी पूर्ववत सुरु होईल, अशी चर्चा सुरु झाली.
मात्र कापूस खरेदी बंद होणाऱ्या केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्यासाठी तांत्रिक कारण सांगण्यात आले. काही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या पावत्या तयार होत नसल्याचे सांगण्यात आले. तर काही केंद्रांवर साॅप्टवेअर काम करत नसल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला काही केंद्रांवर असणाऱ्या या अडचणी इतर केंद्रांपर्यंत पोचल्या. मागील आठवडाभरात राज्यातील बहुतांशी भागात हाच प्रकार घडत गेला. सध्या राज्यातील अनेक केंद्रांवर या अडचणीमुळे कापूस खरेदी बंद आहे.
सॉफ्टवेअरचा बिघाड
खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी बंद होण्यामागे सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे कारण सांगितले जात आहे. कापूस खरेदीची प्रक्रिया राबवण्यासाठी सीसीआयकडून सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या माहीतीची नोंद केली जाते. त्यात शेतकऱ्याचे नाव, सातबारा, कापसाचे वजन, गुणवत्ता, मिळालेला भाव आणि पेमेंटची माहिती भरल्यानंतरच कापूस खरेदी करता येते. त्यानंतर याच माहीतीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा होते. मात्र सध्या सॉफ्टवेअरच बंद असल्याने खरेदी ठप्प झाल्याचे केंद्रांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकरी अडचणीत
खुल्या बाजारात चालू हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचे बाजारभाव कमीच आहेत. पण शेतकऱ्यांना सीसीआयच्या खेरदीचा आधार होता. खुल्या बाजारात आजही सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. यंदा सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. पण बाजारात कमी भाव मिळत असल्याने आणि त्यातच सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.