
Kolhapur News : येणाऱ्या काळात भारतात वाढत जाणारे इथेनॉलचे उत्पादन भविष्यात साखर निर्यातीला मर्यादा आणण्याची शक्यता आहे. ‘बीएमआय’ या संशोधक संस्थेने ‘एशिया बायोफ्युअल आउटलुक’ नावाच्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे.
येणाऱ्या हंगामात साखरेची चणचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने केंद्र निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे जागतिक बाजारात भारतीय साखरेचा दबदबा घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये भारत जागतिक बाजारपेठेत एक प्रमुख निर्यातदार म्हणून समोर आला आहे. केंद्र सरकारने जास्तीत जास्त साखर इथेनॉलकडे वळवण्याला प्राधान्य दिले आहे. कारखान्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत इथेनॉलनिर्मिती वाढविली. यामुळे जादा तयार होणारी साखर इथेनॉलकडे गेली.
परिणामी देशात गेल्या वर्षी साखरेचे जेमतेम उत्पादन झाले. साखरेचे उत्पादन घटल्याचे पाहून केंद्राने हंगामाच्या उत्तरार्धात निर्यातीला परवानगी देण्याचा विचारही केला नाही. यामुळे या कालावधीत जागतिक बाजारात देशाची साखर पोहोचू शकली नाही. परिणामी दोन-तीन वर्षांपासून भारताला मिळालेले नवीन खरेदीदारही दुसरीकडे गेले. हीच परिस्थिती येणाऱ्या हंगामात राहू शकते, असा अंदाज आहे.
२०१७-१८ ला केवळ ६ लाख टन साखर निर्यात झाली होती. यानंतर पुढील वर्षात जागतिक बाजारपेठेत स्थानिक बाजारात क्विंटलला सुमारे १००० रुपये दर कमी असल्याने केंद्राने साखर निर्यातीसाठी फरकाच्या रकमेचे अनुदान दिले, यामुळे २०१८-१९ ला ३८ लाख टन साखर निर्यात झाली.
भारतीय साखर अनेक देशांना स्वस्त पडत असल्याने भारताला साखर विक्रीसाठी नवे देश मिळाले. यानंतर निर्यातीची चढती कमान तयार झाली. २०१९-२० ला ६० लाख टन, २०२०-२१ ला ७० लाख टन तर २०२१-२२ ला उच्चांकी ११० लाख टन साखर निर्यात झाली.
सलग तीन वर्षे भारतीय साखरेने अधिराज्य गाजविले. दर चांगला मिळत असल्याने गेल्या वर्षीही केंद्राने पहिल्या टप्प्यात ६० लाख टनाला परवानगी दिली. पण हंगाम मध्यावर आल्यानंतर साखर उत्पादनाचे अंदाज चुकले आणि आणखी निर्यातीच्या प्रयत्नाला धक्का बसला.
२०१८-१९ ला केवळ ३ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली होती. केंद्राच्या प्रयत्नामुळे २०१९-२० ला ९ लाख टन, २०२०-२१ ला २२ लाख टन, तर २०२१-२०२२ ला ३५ लाख टनांवर पोहोचले. २०२२-२३ ला उच्चांक करताना इथेनॉलकडे साखर वळविण्याचे प्रमाण ४० लाख टनांपर्यंत पोहोचले आहे.
जर इथेनॉलनिर्मिती झाली नसती तर ही साखर जादा झाली असती यामुळे ती निर्यात करता आली असती. पण इथेनॉल निर्मितीमुळे जादा साखरेची भीती कमी झाली. यंदाही ५० लाख टनांपर्यंत साखर इथेनॉलकडे वळविण्याचा केद्राचा प्रयत्न आहे. यामुळे साखरेची निर्मिती जादा होणार नाही असा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.