
New Delhi News : देशातील उसाचे गाळप गेल्यावर्षीपेक्षा कमी झाले आहे. तरीही ऊस पिकाचे झालेले नुकसान आणि कमी उपलब्धता यामुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपणार आहे. देशात यंदा साखर उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ४९ लाख टनांनी कमी होऊन २७० लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत साखर उताराही कमी मिळाला, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील निवडणूक आणि मतदानाची तारीख लक्षात घेऊन राज्य शासनाने ऊस गाळप हंगामाची सुरुवात उशिराने म्हणजे १५ नोव्हेंबर नंतर सुरु केली . थोड्याफार फरकाने कर्नाटक, गुजरात मधील हंगाम देखील काही प्रमाणात उशिराने सुरु झाला. उत्तरेतील राज्यात परतीचा पाऊस आणि दीपावली सणामुळे पूर्ण जोमाने गाळप हंगाम नोव्हेंबर मध्यानंतर सुरु झाला.
३१ जानेवारी २०२५ रोजीच्या ऊस गाळप प्रगती आढाव्यानुसार देशात एकूण ४९४ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. गेल्यावर्षी ५१७ कारखान्यांनी गाळप केले होते. देश पातळीवर १ हजार ८५५ लाख टन ऊस गाळप झाले. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत १ हजार ९३१ लाख टन गाळप झाले होते.
याच्या परिणामस्वरूप ३१ जानेवारीअखेर देशपातळीवर १६५ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत १८७ लाख टन उत्पादन झाले होते. देशपातळीवर सरासरी साखर उतारा देखील ८.९१ टक्के असून तो गतवर्षीच्या या तारखेच्या ९.७० टक्क्यापेक्षा ०.७९ टक्क्याने कमी आहे.
इथेनॉल उत्पादनाकडे वळणारी साखर आणि निर्यात मार्गाने देशाबाहेर जाणारी साखर लक्षात घेता कदाचित हंगाम अखेर नीचांकी साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात याचा अनुकूल परिणाम कारखाना स्तरावरील साखर विक्रीच्या दरावर दिसू शकतो, जेणेकरून कारखान्यांची थकीत बिले, ऊस उत्पादकांची बिले व इतर अनुषंगिक खर्च वेळच्यावेळी कारखान्यांना देणे शक्य होईल, असे सध्या चित्र आहे.
यंदाचा हंगाम २०२४-२५ हा वातावरणातील बदलत्या चक्रामुळे एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. आधी असणाऱ्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीनंतर अति पाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बऱ्याच भागातील उभ्या उसावर तुरे आले आहेत.
ज्यामुळे उसाची वाढ खुंटल्याचे तसेच त्यातील साखरेचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सदरचा ऊस तातडीने गाळपास येत असल्याने या भागातील कारखान्यांचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला जाण्याचा अंदाज आहे,"असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
"केंद्र शासनाने १० लाख टन साखर निर्यातीचा तसेच इथेनॉलचे जाहीर केलेले नवे खरेदी दर, यामुळे देशपातळीवर साखर उद्योगाचे अर्थचक्र चालण्यासाठी मदत होणार आहे. त्याच सोबत बहू प्रलंबित साखरेचा किमान विक्री दराचा निर्णय देखील झाल्यास त्याचे देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे स्वागत आहे,"असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यनिहाय साखर उत्पादनाची स्थिती (कंसातील आकडा पूर्वीचा अंदाज दर्शवितो)
- उत्तर प्रदेश ९३ लाख टन (९८ लाख टन)
- महाराष्ट्र ८६ लाख टन (८७ लाख टन)
- कर्नाटक ४१ लाख टन (४५ लाख टन)
- इतर राज्ये ५० लाख टन (५० लाख टन)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.