
नागपूर : बोकडाच्या मटणाचे दर (Goat Mutton Rate) गेल्या काही वर्षांत वाढले नसल्यामुळे शेळीपालक (Goat Farmer) हवालदिल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बोकडाच्या मटणाचे घाऊक दर ३०० ते ३५० रुपये किलोवर स्थिर असून, मटणाची किरकोळ विक्री मात्र ६५० रुपये किलोने होत आहे. मजुरी आणि पशुखाद्याच्या (Animal Feed) दरात वाढ होत असताना जिवंत बोकडाचे दरही वाढावावेत, अशी पशुपालकांची मागणी आहे.
चिकनच्या तुलनेत बोकडाच्या मटणाला खवय्यांची मागणी अधिक राहते. राज्यात त्यामुळेच शेळीपालकांची संख्या नजीकच्या काळात वाढली आहे. परंतु असे असतानाच गेल्या अनेक वर्षांत बोकडाच्या मटणाचे दर मात्र वाढले नाहीत. राजस्थानमधील सिरोही, सोजत जातीच्या शेळ्यांचा पुरवठा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. मुंबई लगतच्या जिल्ह्यांतील मटण मार्केट याच शेळ्यांनी व्यापले आहे. त्यामुळेच मटण मार्केटमध्ये घाऊक दर वाढत नसल्याचे शेळीपालकांनी सांगितले.
राजस्थानमधून होणारा शेळ्यांचा पुरवठा केवळ दिवाळीचे सात दिवस बंद राहतो. याच काळात महाराष्ट्रातील पशुपालकांना बोकडाचे प्रति किलो दर चारशे ते ४२५ रुपयांपर्यंत मिळतात, अशी माहिती एका पशुपालकाने दिली. हा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेळीपालकांना ३०० ते ३५० रुपये किलोचा दर जिवंत शेळीसाठी मिळत आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र मटण खवय्यांना प्रत्येक किलोसाठी ६५० रुपये इतके पैसे चुकवावे लागत आहेत.
कोंबड्यांवर काही आजार ओढवल्यास बाजारात बोकडाच्या मटणाला मागणी वाढते. याही काळात मटणाचे दर किरकोळ बाजारात वधारतात. पशुपालकांना मात्र या काळात नेहमीचाच दर दिला जातो असा अनुभव अनेक पशुपालकांचा आहे. बोकडाचे वजन वाढावे याकरिता त्यांना पौष्टिक पशुखाद्य दिले जाते. त्यामध्ये मक्याचा प्रामुख्याने समावेश राहतो. ६० टक्के मका आणि ४० टक्के इतर घटक याप्रमाणे पशुखाद्य मिश्रण राहते. सध्या मक्याचे दर जागतिकस्तरावर तेजीत असल्याने त्याचाही परिणाम पशुपालनावर झाला आहे.
कातडीची बाजारपेठही प्रभावित
एका बोकडाचे वजन सहा महिन्यांत सरासरी २५ ते ३० किलोपर्यंत वाढते. सरासरी ३० किलो वजन आणि ३०० रुपयांचा दर अपेक्षित धरल्यास नऊ हजार रुपयांचा बोकड होतो. एका ३० किलो वजनाच्या बोकडापासून १६ किलो (५५ टक्के) मटण मिळते. उर्वरित भाग वाया ठरतो. यापूर्वी बोकडाच्या कातडीलादे खील मागणी होती. परंतु केंद्रात भाजप सरकार आल्यापासून बोकडाच्या कातडीची बाजारपेठ प्रभावित झाली. त्यामुळे हे अतिरिक्त उत्पन्नदेखील पशुपालकांना मिळणे कठीण झाले आहे. त्याचाही परिणाम उत्पन्नावर झाला आहे.
बंदिस्त शेळीपालनात महिन्याला मजुरांवर होणारा दहा हजार रुपये खर्च अपेक्षित धरल्यास वर्षाला एक लाख वीस हजार रुपये होतात. सरासरी १३ बोकडांची ही विक्री किंमत ठरते. त्यामुळे पशुपालकाकडे जनावरांची संख्या अधिक असणे गरजेचे राहते. तरच मजुरी व खाद्यावरील होणारा खर्च वजा जाता नफा उरणार आहे. राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर होणारी सिरोही व सोजत शेळ्यांची आवक दरावर परिणाम करणारी ठरली आहे.
- अनिल ऊर्फ नंदू मापारी, शेळीपालक, लोणार, बुलडाणा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.