
Jalgaon Cotton Market Update : खानदेशात कापूस दरावरील (Cotton Rate) दबाव मागील तीन ते चार दिवसांत वाढला आहे. दर ७८०० ते ७९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ७६०० ते ७७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खानदेशात रोज ५० हजार क्विंटल कापसाची आवक (Cotton Arrival) होत आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी या काळात खानदेशात प्रतिदिन सरासरी २५ हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ३५ हजार क्विंटल कापसाची आवक खानदेशात झाली. तर या महिन्यात प्रतिदिन सरासरी ४५ हजार क्विंटल एवढी कापसाची आवक राहिली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून प्रतिदिन ५० ते ५२ हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे.
मार्चमध्ये शेतकऱ्यांना बँकांचे पीककर्ज भरायचे होते. तसेच वित्तीय गरजा होत्या. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी कापूस विक्रीस काढला. परंतु दर कमीच आहेत. कारण शेतकऱ्यांना किमान साडेनऊ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल, एवढ्या दरांची अपेक्षा होती.
कारण कापसाला प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये खर्च लागला आहे. उत्पादन प्रतिएकर सरासरी पाच क्विंटल आहे. काहींना तर प्रतिएकर चार क्विंटल एवढेच उत्पादन मिळाले आहे.
उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना दरांची अपेक्षा होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. नोव्हेंबर अखेरीस दर ८५०० रुपये झाले. त्यानंतर दरात सतत घसरण झाली.
या महिन्याच्या सुरुवातीला दर ८००० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु त्यात मागील चार ते पाच दिवसांत आणखी घसरण झाली. बाजारात आवक वाढल्याने कापूस दरांवर दबाव वाढल्याचा मुद्दा जाणकार उपस्थित करीत आहेत.
खानदेशात नंदुरबार व धुळे जिल्ह्यात कमाल शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापसाची विक्री केली आहे. या दोन्ही तालुक्यात २५ ते ३० टक्केच कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. जळगावातही अमळनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव आदी भागांत कमाल कापूस उत्पादकांनी आपल्या कापसाची विक्री केली आहे.
तर जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, एरंडोल आदी भागांत ४० ते ४५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. कापूस खरेदीसंबंधी गुजरात व मध्य प्रदेशातील कारखानदार, खरेदीदार खानदेशातील एजंटची मदत घेत आहेत. तसेच धरणगाव, एरंडोल आदी भागांतील कारखानदेखील खरेदी करीत आहेत.
अंदाजापेक्षा कमी कापूस गाठींची निर्मिती
सध्या खानदेशात रोज १० ते ११ हजार कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती केली जात आहे. खानदेशात यंदा २१ ते २२ लाख कापूसगाठींचे उत्पादन हाती येईल, असा अंदाज होता.
परंतु मे महिना जवळ आला तरीदेखील १८ लाख गाठींचेदेखील निर्मिती किंवा उत्पादन झालेले नाही. मागील हंगामात खानदेशात जूनअखेरपर्यंत १९ लाख कापूसगाठींची निर्मिती झाली होती. तर शेतकऱ्यांकडील कापूससाठा मार्चअखेर ९८ टक्के संपला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.