
Amaravati News : ढगाळ वातावरण तसेच देशाच्या काही भागांत पडलेल्या पावसामुळे यंदा आंबिया बहरातील फळांना मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांकडून आंबिया बहरातील संत्रा फळांना अपेक्षित दर मिळाला नाही.
त्यामुळे मृग बहरातील संत्रा फळातून तूट भरून निघेल, अशी अपेक्षा उत्पादकांना आहे. सध्या मृगाच्या संत्र्याला ५० रुपये किलोपर्यंतचा दर मिळत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपनीचे राकेश मानकर यांनी सांगितले.
आंबिया बहरातील संत्रा फळांना यंदा ढगाळ वातावरण, पाऊसमानाचा मोठा फटका बसला. हंगामात कमीत कमी १०,००० तर चांगल्या प्रतीच्या फळांचे दर ४५००० हजार रुपये टनापर्यंतचे पोहोचले होते.
आंबिया बहर अंतिम टप्प्यात असताना बाजारातील मालाची आवक कमी होत गेली. त्यातूनच दरात सुधारणा होत हे दर पूर्वीच्या १० ते २५ हजार रुपयांवरून ३० हजार, तर ४५ हजार आणि ५० हजार रुपये टनापर्यंत पोहोचले होते.
आता पुन्हा दरात घसरण होत हे दर ३० हजार रुपयांवर आले आहेत, अशी माहिती राकेश मानकर यांनी दिली. दरातील तेजीच्या अपेक्षेने अनेक संत्रा बागायतदार फळे झाडावर ठेवतात. परंतु या वर्षी वातावरणात सातत्याने बदल होत गेले.
डिसेंबरमध्ये काढणीला येईल, अशी अपेक्षा असलेली फळांवर नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित रंगछटा पडल्या. हे फळ नाशिवंत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीशिवाय पर्याय उरला नाही. त्याचाही परिणाम दरावर झाला.
सध्या काही बागायतदारांनी दरातील तेजीच्या अपेक्षेने झाडावर फळे ठेवली आहे. त्यांची संख्या जेमतेम आहे. दुसरीकडे बाजारात सध्या काही प्रमाणात मृग बहरातील फळांची आवक होत असून ती अत्यल्प आहे. पहिल्या टप्प्यातील या फळांना ५० हजार रुपये टन असा दर मिळत आहे.
हा दर कायम राहील, अशी शक्यता कमी असली तरी संपूर्ण हंगामात ३५ ते ४० हजार रुपये टन असा दर राहील. बाजारातील आवक आणि मागणीनुसार दरातील तेजी-मंदी ठरते, असे नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राकेश मानकर यांनी सांगितले.
पोंगलमुळे दरात तेजी
आंध्र प्रदेशात पोंगल उत्सवाच्या काळात संत्र्यासह विविध फळांना आठवडाभर मागणी राहते. त्यामुळे दरवर्षी दर तेजीत येतात, असा अनुभव आहे. त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी झाडांवर फळे ठेवली होती. हंगामाच्या अखेरीस आणि पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा संत्रा बागायतदारांना होती. परंतु यंदा अपेक्षित मागणी नसल्याने दर ३०,००० रुपये टनावर स्थिरावले असल्याची माहिती राकेश मानकर यांनी दिली.
१३ एकरांतून ४७ लाख रुपये
शास्त्रोक्त व्यवस्थापनाच्या माध्यमातून बेनोडा (शहीद, ता. वरुड) येथील मनोज टावरी यांनी फळांचा दर्जा राखला होता. त्यातून चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. यंदा त्यांनी १३ एकर क्षेत्रातील २२०० झाडांवरील संत्र्यांची थेट व्यापाऱ्यांना विक्री केली. ४७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न यातून त्यांना झाले. सरासरी २० रुपये प्रति किलो असा दर मिळाला, अशी माहिती मनोज टावरी यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.