
Nashik News: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत मागीलवर्षी ५ लाख टन कांदा खरेदी भारतीय राष्ट्रीय कृषी, सहकार व विपणन महासंघ(नाफेड) व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या दोन नोडल एजन्सीमार्फत झाली. या खरेदीतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ही खरेदी गाजली.
आता ‘नाफेड’ने बदल करत खरेदीचे नियोजन सुरू करताना महासंघांना दूर ठेवले तर सदस्य संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या असून नाशिकमध्ये ‘नाफेड’चे वरिष्ठ अधिकारी व सदस्य संस्थांची मंगळवारी (ता. ८) यासंबंधी बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गैरव्यवहारामुळे नाइलाजास्तव ‘नाफेड’वर ही वेळ आली आहे. तर ‘एनसीसीएफ’ने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. गेल्यावर्षी कांदा खरेदीतील गोंधळ कानावर आल्यानंतर ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी स्वतः नाशिक दौऱ्यावर पाहणी करून गैरप्रकारांची पोलखोल केली होती.
मात्र पुढे हा मुद्दा दाबला गेल्याची चर्चा रंगली होती. तर खरेदी पूर्ण झाल्यानंतर पुढे चाळीत साठा उपलब्ध नसणे, कांदा रिकव्हरी हे प्रकार घडले. तर प्रत्यक्षात उन्हाळ कांद्याची खरेदी करून काही महासंघांनी प्रतवारी नसलेला खरीप पोळ कांदा खपवला. त्यामुळे मोठी बदनामी वाट्याला आल्यानंतर यंदा ‘नाफेड’च्या नव्या व्यवस्थापकीय संचालकांनी बदल हाती घेतले आहेत.
यंदा खरेदी ‘नाफेड’ने सदस्य असलेल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केल्याचे दिसते. ज्यामध्ये कांदा खरेदी, साठवणूक, देखभाल व उपनगरीय केंद्रांना पाठवण्यासाठी इच्छुक असलेल्या नाफेडच्या सर्व सदस्य संस्थांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.
मात्र गेल्या काही वर्षांत कांदा खरेदीतील डागाळलेली ही प्रतीमा सुधारण्याचे आव्हान ‘नाफेड’च्या व्यवस्थापनासमोर असेल. यापूर्वी व्यवस्थापकीय संचालकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ व सदस्य संस्थांची खुली आभासी पद्धतीने बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत ज्यांच्याकडे ६ हजार टन साठवणूक क्षमता आहे, अशाच घटकांना कांदा खरेदी देण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला होता.
खरेदी पूर्ण करण्याचे असणार आव्हान
‘नाफेड’च्या बहुतांश सदस्य संस्थांकडे प्रामुख्याने ५ हजार टनांच्या जवळपास कांदा साठवणूक क्षमता नाही. काहींकडे उपलब्ध आहे; मात्र त्या कांदाचाळी जुन्या झाल्या. त्यातच आता काही महासंघ व्यापारी पद्धतीने कामकाज करत आहे. त्यात मोठा गोंधळ आहे. त्यांची पुढे घुसखोरी व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून मागील वर्षी जवळपास २२ महासंघांनी कांदा खरेदी केला; मात्र २. ५ लाख टन खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झालेला नव्हता. यंदा बदल झाल्यानंतर खरेदी बाजार समिती आवारात खुल्या लिलाव पद्धतीने व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची व लोकप्रतिनिधींची आहे, याचा विचार होणार का? हे पाहणे अपेक्षित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.